बहुजननामा ऑनलाइन टीम – केरळच्या तिरुवनंतपुरममध्ये सीपीएमच्या 2 कार्यकर्त्यांची धारदार शस्त्रानं वार करून हत्या करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. सीपीएमनं या हल्ल्यामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला आहे. हत्येच्या संशयावरून पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. वेंजरामु़ड़्डू परिसरात ही घटना घडली आहे.
नेमकं काय घडलं ?
रविवारी रात्री उशीरा वेमबायमचे रहिवासी मिथिलज (वय 32) आणि हक मोहम्मद (वय 25) हे दुचाकीवरून जात होते. हक हा मिथलज याला घरी सोडण्यासाठी जात होता. थेम्मपाम्मुड्डू परिसरात ते आले असता वाटेतच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता.
4-5 जणांनी हल्ला केल्याचा संशय
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणांवर ज्या पद्धतीनं धारदार शस्त्रानं वार झाले आहेत ते पाहता किमान 4-5 जणांनी हा हल्ला केला असावा असा अंदाज व्यक्त केला आहे. दोघांच्याही शरीरावर खोलवर जखमा होत्या. शवविच्छेदनासाठी दोघांचे मृतदेह पाठवण्यात आले आहेत. सदर घटनेच्या तपासाला पोलिसांनी सुरुवात केली आहे.
हल्ल्यामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप
या घटनेनंतर सीपीएमनं पक्ष कार्यकर्त्यांच्या हत्येमागे काँग्रेसचा हात असल्याचं म्हटलं आहे. राजकीय सूडातून ही हत्या झाल्याचं पक्षाचं म्हणणं आहे. पक्षाकडून पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. या हत्येमागे काँग्रेस कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.
घटनास्थळावरून 2 दुचाकी जप्त, प्रत्यक्षदर्शींकडे चौकशी सुरू
या परिसरातील लोकांची या प्रकरणी चौकशी केली जात आहे अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. काही प्रत्यक्षदर्शींची चौकशी करत त्यांचे जबाबही नोंदवले जात आहे. घटनास्थळी सापडलेल्या 2 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. डीवायएफआय चे नेते ए ए रहिम यांनी ही पूर्वनियोजित हत्या असल्याचा आरोप केला आहे.