बहुजननामा : ऑनलाईन टीम – महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाची येत्या सोमवारी (दि.20) होणारी सोमवती अमावस्या यात्रा रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थ-मानकरी मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे वाजत-गाजत पालखी खांद्यावर घेऊन समात्र नित्य सेवेकरी, मानकरी यांच्या हस्ते खंडोबाचे सर्व धार्मिक विधी होणार आहेत. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी ग्रामस्थ मंडळाने बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख वतनदार राजेंद्र पेशवे, सचिन पेशवे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे,जेजुरीचे सहा.पोलिस निरिक्षक अंकुश माने,देवस्थानचे मुख्य विश्वस्त संदीप जगताप ,विश्वस्त शिवराज झगडे ,पंकज निकुडे, अविनाश सातभाई,माजी विश्वस्त सुधीर गोडसे उपस्थित होते.
कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने जेजुरी शहर व परिसर कॅन्टोन्मेंट म्हणून घोषित करण्यात आला आहे. 14 दिवस जेजुरी शहर पूर्णपणे लॉकडाउन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जेजुरी येथील येत्या सोमवारी होणारा सोमवती यात्रा उत्सव रद्द करण्यात आला असून परंपरेनुसार कर्हास्नानासाठी गडावरुन प्रस्थान होणारा पालखी सोहळाही रद्द करण्यात आला आहे. नित्य सेवेकरी,पुजारी,मानकरी यांचे हस्ते सोमवती उत्सवाचे सर्व धार्मिक विधी होणार आहेत.
खंडोबा – म्हाळसादेवीच्या उत्सवमूर्ती सजविण्यात आलेल्या चार चाकी वाहनातून कर्हा नदीवर नेण्यात येणार आहेत. तेथे सुरक्षित अंतर ठेवून मूर्तींना अभिषेक, स्नान घालण्यात येणार आहे. ग्रामस्थांना रोजमुरा ( ज्वारी ) घरपोच वाटप करण्यात येणार आहे. प्रशासनाच्या सुचनांचे काटेकोर पालन करून धार्मिक विधी करणार असल्याचे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे यांनी सांगितले.