मुंबई: राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही (Sharad Pawar NCP) या निवडणुकीत आपली जादू दाखवली. पुढील विधानसभा निवडणुकीत एकसंधपणे लढलो, तर महाराष्ट्रात आमचे १८० पेक्षा जास्त आमदार निवडून येतील. याची आम्हाला खात्री आहे. (Jayant Patil On Vidhan Sabha Maharashtra)
कारण आता महाराष्ट्राचं वातावरण तसं आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते पुढे म्हणाले, “महागाई देशात प्रचंड वाढलेली आहे. जीएसटीच्या वाढती टक्केवारीचा लोकांना फटका बसला आहे. यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कारभाराला लोकं त्रस्त झाली होती.
महाराष्ट्रातली जनता या राज्यकारभाला प्रचंड कंटाळलेली आहे. मोदींच्या कारभाराचा जनतेनं हा अभिप्राय दिला आहे. महाराष्ट्रात दोन पक्ष फोडून राज्य कोणत्याही परिस्थितीत आणलं. या सर्व गोष्टी महाराष्ट्राच्या मनाला लागलेल्या आहेत. त्याचा परिणाम विधानसभेत दिसेल. “,असे जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.