बहुजननामा ऑनलाईन – जम्मू कश्मीरमध्ये लवकरच सरकारी खात्यातील पन्नास हजार रिक्त जागा भरण्यात येणार असल्याची घोषणा राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी बुधवारी (ता.२८) पत्रकार परिषदेत केली. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर आता काश्मीरमधील तरुणांसाठी पहिल्यांदाच ही मेगा नोकरभरती होणार आहे. यावेळी काश्मिरी तरुणांनी या नोकरभरतीचा लाभ घेण्याचं आवाहनही मलिक यांनी केलं आहे.
मलिक म्हणाले, येत्या सहा महिन्यात जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी अनेक महत्त्वाची कामं करण्यात येणार आहेत. त्यासाठी केंद्राच्या विविध मंत्रालयाच्या बैठकामधून महत्वाचे निर्णय घेण्यात येत असून जम्मू कश्मीर राज्याच्या विकासासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या दोन ते तीन महिन्यात सर्व सरकारी रिक्त पदे भरण्यात येणार असून काश्मिरी तरुणांनी या सरकारी सेवेत दाखल व्हावे.
काश्मीरमध्ये दहशतवाद्याकडून फोन आणि इंटरनेटचा अवैध वापर होत होता. इंटरनेटद्वारे काश्मिरी जनतेच्या भावना भडकावण्याचं काम सुरू होतं. भारताविरुद्ध भडकावल्यामुळेच जम्मू-काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली होती, असही त्यांनी यावेळी स्पष्ट केल. कुपवाडा आणि हंदवाडामध्ये मोबाइल फोन सेवा सुरू करण्यात आली असून इतर ठिकाणीही हळूहळू इंटरनेट सेवाही पूर्वपदावर येईल. दरम्यान, काही दिवसांपुर्वी काश्मीरमध्ये हिंसाचाराच्या अफवा पसरविण्यात येत आहेत. राज्यात काही ठिकाणी आंदोलनं झाली असली तरी त्यात एकाचाही मृत्यू झालेला नाही. आमच्यासाठी प्रत्येक काश्मिरीं नागरिकाचा प्राण महत्त्वाचा आहे.असेही त्यांनी यावेळी नमुद केले.