बहुजननामा ऑनलाइन : पालघर साधू हत्याकांडासंदर्भात आवाज उठवणे, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी करणे हा ठाकरे सरकारच्या काळात गुन्हा झाला आहे. आ. राम कदम यांनी या प्रकरणी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल होत. यातून राज्यात जुलमी राजवट सुरु असल्याचे दिसून येत असल्याचे टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ( Leader of Opposition in the Legislative Council Praveen Darekar) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray government) केली आहे. पण तुम्ही कितीही मुस्कटदाबी करा, कितीही लोकांना अटक करा. या राज्यात साधु-संतांसाठी हिंदुत्वासाठी व महाराष्ट्राच्या हितासाठी भाजपा व महाराष्ट्रप्रेमी कार्यकर्ते, हिंदुत्वप्रेमी कार्यकर्ते लढत राहतील अन् आपल्याला त्याचा जाब विचारतील, असे दरेकर यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओत म्हटल आहे.
भाजपा नेते राम कदम यांच्या जनआक्रोश आंदोलनास परवानगी नाकारत, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. या पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
पालघर हत्याकांड प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीसाठी भाजपा आमदार राम कदम यांनी जनआक्रोश यात्रेचे आयोजन केले होते. मात्र, ही यात्रा निघण्या अगोदरच आ. कदम यांना पोलिसांनी त्यांच्या निवास्थानावरून ताब्यात घेतले होते. यानंतर भाजपा नेते नारायण राणे व आमदार नितेश राणे यांनी कदम यांची भेट घेण्यासाठी खार पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यानंतर कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ” हा संघर्ष थांबणार नाही, येणाऱ्या काळात लोक महाराष्ट्र सरकारचा विरोध करत रस्त्यांवर उतरतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.