जळगाव : बहुजननामा ऑनलाईन – जाणीव परिवार व दर्पण पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन बालगंधर्व नाट्यगृहात करण्यात आले होते. या वधू- वर मेळाव्यात १०० युवक -युवतींनी आपला परिचय करुन दिला. या मेळाव्याला महाराष्ट्रासह राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात राज्यातील बौध समाज बांधवांनी उपस्थिती दिली. बुध्दवंदनेने मेळाव्याची सुरुवात झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उषाबाई वाघ यांची उपस्थिती होती. याप्रसंगी ॲड. सी.बी.वाघ, मुकुंद सपकाळे, अशोक बाविस्कर, दिनकर अडकमोल, विश्वासराव बिऱ्हाडे, अनिल बागुल, राजमहेंद्र बिऱ्हाडे, दिलीप सपकाळे, राजेंद्र सपकाळे, रेखा हिवरे, सुधा वाघ, चंद्रकांत संदानशिव, नलिनी संदानशिव, भास्कर वानखेडे आदिंची उपस्थिती होती.
दरम्यान, मुलींनी अपेक्षा व्यक्त करतांना आपला भावी पती हा समजूतदार व पत्नीला समान दर्जा देणारा असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली तर, मुलांनी पत्नी ही सर्वांना घेऊन चालणारी असावी, असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवराज वाघ यांनी केले तर मुकुंद सपकाळे व हरिचंद्र सोनवणे यांनी समयोचित भाषणे केली. यावेळी चंद्रकांत संदानशिव लिखित ‘अभिव्यक्ती’ या कविता संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डी.बी.ढिवरे, आंचल वाघ यांच्यासह जाणीव परिवार व दर्पण पब्लिकेशनच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. तसेच आभार प्रदर्शन आंचल वाघ यांनी केले.