मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – बीसीसीआय ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना (Indian Cricket) आहे. २०२० मध्ये त्यांनी जवळपास ३२०० कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे खेळाडूंनाही बीसीसीआय तगडा पगार देते. बीसीसीआयनं त्यांच्या खेळाडूंची A+, A, B, C अशा चार ग्रेडमध्ये विभागणी केली आहे. जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये भारतीय खेळाडू (Indian Cricketers) आघाडीवर आहेत. ग्रेड A+ मधील खेळाडूला वर्षाला ७ कोटी, ग्रेड A साठी ५ कोटी , ग्रेड B मधील खेळाडूला ३ आणि ग्रेड C मधील खेळाडूला १ कोटी पगार दिला जातो. त्यांनी वर्षाला कितीही सामने खेळले तरी त्यांना हा पगार मिळतोच. करारबद्ध खेळाडू वर्षाला एकही सामना खेळला नाही तरी त्याला तो पगार मिळणार. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक कसोटी मालिका विजयानंतर बीसीसीआयनं संघाला ५ कोटींचं बक्षीस जाहीर केलं होतं.
खेळाडूंना बीसीसीआयकडून मिळणाऱ्या पगाराशिवाय मॅच फी वेगळी दिली जाते. त्यांना एका कसोटीसाठी १५ लाख, एक वन डे साठी ६ लाख आणि एका ट्वेंटी-२० साठी ३ लाख रुपये दिले जातात. जर एखादा खेळाडू प्लेईंन इलेव्हनमध्ये नसेल तर त्याला या रक्कमेतील ५० टक्के मॅच फी दिली जाते. मॅच फी व्यतिरिक्त खेळाडूंना बोनस मनी पण मिळतो. हे फक्त कसोटी क्रिकेटपटूला मिळतो. कसोटीत द्विशतक झळकावणाऱ्या ७ लाख, शतक झळकावणाऱ्याला ५ लाख दिले जातात. एखाद्या गोलंदाजानं पाच विकेट्स घेतल्या तर त्याला पाच लाखांचा बोनस दिला जातो. आर अश्विननं इंग्लंडविरुद्धच्या चेन्नई कसोटीत शतक व ८ विकेट्स घेतल्या होत्या आणि त्याला त्या सामन्यात २५ लाखांचा बोनस मिळाला होता.|