नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत विरुध्द इंग्लंड यांच्या झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला. या पराभवाचे खापर मात्र कर्णधार विराट कोहलीने खेळपट्टीवर फोडल आहे. खेळपट्टीमुळे आम्हाला नीट खेळता आले नाही. या खेळपट्टीवर काय करायचं हेच आम्हाला समजले नाही. पण आम्ही आमची चूक मान्य करतो. संघातील प्रत्येकाला त्याची चूक कळाली असून पुढच्या सामन्यात आम्ही याची नक्की काळजी घेऊ असे कोहलीने म्हटले आहे.
भारत विरुध्द इंग्लंडच्या पहिल्या टी-20 सामन्यासाठी ज्या खेळपट्टीचा वापर केला होता. ती काळ्या मातीने तयार केली होती. कसोटी सामन्यासाठी वापरलेल्या खेळपट्टीपेक्षा खूप वेगळी खेळपट्टी होती. कसोटीच्यावेळी लाल मातीच्या खेळपट्टीचा वापर केला होता. आमची फलंदाजी अतिशय वाईट झाली. आम्ही वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. मात्र आता वस्तुस्थिती स्वीकारावी लागेल. खेळपट्टी जाणून घेण्यासाठी आम्ही वेळ दिला नाही. मात्र श्रेयस अय्यरने तो प्रयत्न केला. पण त्यानंतरही आम्ही 150 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चढ उतार येतात. ज्यावेळी आपल नशीब जोरावर असते त्या दिवशी आपण मोठी धावसंख्या उभारतो. पण प्रत्येक वेळी अस होत नसल्याचे तो म्हणाला. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाचा 8 विकेट्सने दारुण पराभव झाला. इंग्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला 20 षटकांच्या अखेरीस 8 विकेट्सच्या मोबदल्यात फक्त 124 धावा करता आल्या होत्या. भारतीय संघाचे पहिले चार फलंदाज संघाच्या अवघ्या 50 धावांच्या आतच माघारी परतले होते. इंग्लंडने भारताच 125 धावांचे कमकुवत आव्हान अवघ्या 2 विकेटस गमावून गाठल आहे.