नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात सपाटून मार खाल्यानंतर टी २० मध्ये विजय मिळवत भारताने लाज राखली. त्यानंतर आता कसोटी मालिका सुरु होणार आहे. मात्र या मालिकेसाठी असणाऱ्या भारतीय संघात पहिल्या कसोटीनंतर विराट कोहलीचा सहभाग नाही. पहिल्या कसोटीनंतर कोहली पितृत्व रजेनिमित्त भारतात परतणार आहे.
त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दिवस-रात्र कसोटीत विजय मिळवला नाही तर कोहलीच्या अनुपस्थितीत यजमान संघाला मालिकेत पराभूत करणे कठीण जाईल, असे मत भारताचे माजी कर्णधार व माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी व्यक्त केले आहे.
भारत १७ डिसेंबरपासून एडिलेडमध्ये दिवस-रात्र कसोटीसह बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेची सुरुवात करणार असून कुंबळे यांच्या मते ही लढत भारतासाठी मोठे आव्हान असेल. कुंबळे म्हणाले, स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर संघात पुनरागमन करीत आहे. जर आपण पहिला कसोटी सामना जिंकत आगेकूच केली तर टीम इंडियाकडे गेल्या दौऱ्याची पुनरावृत्ती करण्याची चांगली संधी राहील. विराट तीन कसोटी सामन्यांत खेळणार नसला तरी फलंदाजी असो किंवा गोलंदाजी या दोन्हीमध्ये भारतीय संघाची क्षमता आहे.
अव्वल पातळीवर गुलाबी चेंडूने खेळण्याचा अधिक अनुभव भारतीय खेळाडूंकडे नाही. संघाने केवळ एक सामना गुलाबी चेंडूने वर्षभरापूर्वी बांगलादेशविरुद्ध खेळला आहे. त्यात भारताने एक डाव ४६ धावांनी विजय मिळविला होता. ऑस्ट्रेलिया संघाने मात्र गेल्या काही वर्षात दिवस-रात्रचे अनेक सामने खेळले आहेत. त्यामुळे भारतीय संघापुढे जिंकण्याचे मोठे आव्हान असणार आहे. असेही कुंबळे यांनी सांगितले