बहुजननामा ऑनलाईन – भारताची पहिली रुग्णालय असलेली रेल्वे लाईफलाईन एक्सप्रेस मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसवर पोहचली. १९९१ मध्ये सुरु झालेल्या या लाइफलाइन एक्सप्रेसने आतापर्यंत भारतातील दुर्गम भागातील सुमारे 12 लाख रूग्णांना वैद्यकीय सेवा पुरविली आहे. ही रेल्वे चालते फिरते रुग्णालय असल्यानेच या गाडीचे नाव लाइफलाईन एक्स्प्रेस ठेवण्यात आले होते. लाइफलाईन एक्सप्रेसने आतापर्यंत देशातील १९ राज्यातील, १३८ जिल्ह्यांमधील २०१ ग्रमीण भागात पोहचून वैद्यकीय सेवा दिली आहे. या दौऱ्यात रुग्णालयाने तब्बल १२ लाख रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरविली. यामध्ये १.४६ लाख रुग्णांवर शस्त्रक्रियाही करण्यात आल्या आहेत.
लाईफलाईन मध्ये उपाचारासाठी देशभरातील ग्रामीण आणि मागासवर्गीय भागात रुग्णांचे ब्लू प्रिंट तयार करण्यात येते. ट्रेनमधील उपचारासाठी तारीख दिली जाते. त्यानंतर रुग्णांवर निश्चित वेळेत उपचार केले जातात. या ट्रेनमध्ये वैद्यकीय तपासणीपासून शस्त्रक्रियेपर्यंत रुग्णांवर उपचार केले जातात. मोठ्या कंपन्या सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) च्या माध्मातून या कामात हातभार लावत असतात. त्यासाठी रूग्णांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. या ट्रेनने भारतासह जगभरात आपला ठसा उमटविला आहे. अपंग प्रौढ आणि बालकांना ऑन द स्पॉट उपचार देण्यासाठी लाइफलाईन एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे.
ही लाइफलाईन एक्सप्रेस सुरू करण्यासाठी भारतीय रेल्वेच्या जुन्या डब्यांची दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर त्याचे रुपांतर रुग्णालयात करण्यात आले. आतापर्यंत देशभरातील दुर्गम भागातील नागरिकांच्या उपचारासाठी प्रत्येक झोनमध्ये अशी एक ट्रेन असायला हवी होती. मात्र दुर्दैवाची बाब अशी की, आतापर्यंत फक्त एकच ट्रेन तयार करण्यात आली आहे. भारतात अशा प्रकारच्या रेल्वे प्रकल्पावर एक ते दीड कोटी रुपये खर्च केले जातात, ज्यामध्ये सरकार पाहिजे असल्यास मदत करू शकते. सुरुवातीच्या काळात या ट्रेनमध्ये आदिवासी भागातील रुग्णांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया होत असे. परंतु, आता प्लास्टिक सर्जरी, ईएनटी आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांवरही उपचार केले जातात.