बहुजननामा ऑनलाईन : – लडाख सीमेवर चीनसह तणावात्मक परिस्थिती आहे. चीनने सोमवारी रात्री उशिरा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पेट्रोलिंग दरम्यान भारतीय सीमेवरुन गोळीबार केल्याचा आरोप केला आहे, जो भारत सरकारने स्पष्टपणे फेटाळला आहे. भारतीय सैन्यानंतर आता परराष्ट्र मंत्रालयानेही (एमईए) चीनच्या एलएसीवर गोळीबार केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले- ‘आम्ही ग्लोबल टाईम्स तसेच चिनी माध्यमांमध्ये चालू असलेले अहवाल पाहिले. यामध्ये एनएसए अजित डोभाल यांच्याविषयीही काही टिप्पण्या केल्या गेल्या आहेत. हे अहवाल पूर्णपणे बनावट आणि खोटे आहेत. त्यांना काही आधार नाही. आम्ही माध्यमांना अशा वृत्तांकनापासून दूर राहण्याचे आवाहन करतो.’
हे आहे चीनचे खोटे
चिनी सैन्याच्या वेस्टर्न थिएटर कमांडच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्याने ७ सप्टेंबर रोजी पॅंगॉन्ग त्सोच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर एलएसी ओलांडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. एलएसी ओलांडल्यानंतर भारतीय सैन्याने हवाई गोळीबारही केला. त्यांचा आरोप आहे की, भारतीय सैन्याने शेनपाव भागात एलएसी ओलांडली आणि जेव्हा चिनी पेट्रोलिंग पार्टी भारतीय सैनिकांशी बोलण्यास पुढे आली, तेव्हा त्यांनी प्रत्युत्तरात वॉर्निंग शॉट दिला म्हणजेच हवेत गोळ्या झाडल्या.
मंगळवारी भारतीय सैन्याने अधिकृत निवेदन देऊन चीनची पोलखोल केली. लष्कराने सांगितले की, ‘आम्ही एलएसीवर परिस्थिती सामान्य करण्यासाठी प्रयत्न करत आहोत, तर चीन चिथावणीखोर कृत्य करत आहे. आम्ही एलएसी ओलांडली नाही आणि गोळीबारही केला नाही किंवा अशाप्रकारचे कोणतेही कृत्य केले नाही. चीन निष्काळजीपणे दोन्ही देशांमधील कराराचे उल्लंघन करत आहे.’ सैन्याने म्हटले की, एकीकडे ते आपल्याशी लष्करी, मुत्सद्दी व राजकीय पातळीवर चर्चा करत आहे आणि दुसरीकडे अशी कृत्ये करत आहे.
सार्वभौमत्व आणि सीमांच्या संरक्षणाच्या किंमतीवर शांती नाही
लष्कराने असेही म्हटले आहे की, आम्हाला शांतता प्रस्थापित करायची आहे, पण कोणत्याही परिस्थितीत देशाच्या सार्वभौमत्वाचे आणि सीमांचे संरक्षण करू. सैन्याच्या म्हणण्यानुसार, चीनच्या वेस्टर्न थिएटर कमांडने चुकीचे वक्तव्य करून आपल्या देशातील आणि उर्वरित जगातील लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.
७ तारखेच्या रात्री काय झाले?
सूत्रांनी सांगितले आहे की, ७ सप्टेंबरच्या रात्री चीनी सैनिकांची एक पेट्रोलिंग टीम लोखंडी रॉड व काटेरी दंडुके घेऊन मुखपारी शिखरावर ताबा करण्यासाठी जात होती, त्यावेळी भारतीय सैनिकांनी त्यांना रोखले. बर्याच वेळा इशारा दिल्यानंतर जेव्हा चिनी सैनिकांनी ऐकले नाही, तेव्हा सैनिकांनी त्यांना उत्तर दिले. यावेळी सैन्याने कोणताही गोळीबार केल्याचे नाकारले आहे.
चीनच्या रोषाचे हे आहे कारण
लडाखमधील पॅंगॉन्ग तलावाच्या क्षेत्राबाबत चीन तीन कारणांमुळे त्रस्त आहे. पहिले- ब्लॅक टॉप आणि हेल्मेट टॉपवर भारतीय लष्कराने सशक्त पोझिशन घेतल्यानंतर चीनची पोस्ट भारतीय गोळीबार श्रेणीत आहे. दुसरे- भारतीय सैनिक उंचावर आहेत, तर चीनची पोस्ट खाली आहे. यामुळे चीनची पोझिशन आणि ट्रूप्स भारतीय भागातून पाहता येते. तिसरे- आपल्या पोझिशनमुळे चीनचे भारतीय भागातील प्रवेश बिंदू बंद झाले आहेत. तेथे आता भारतीय सैन्याचे वर्चस्व आहे.