पुणे : बहुजननामा ऑनलाईन – मागील काही काळातील देशाच चित्र पाहिलं तर आज संसदेत जाती धर्माचा उन्माद माजविणारे लोक बसलेले आहेत. असे प्रतिपादन माजी मंत्री रमेश बागवे यांनी केले आहे. ते राजर्षी शाहू महाराज समाज विकास संस्थेच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांची जयंती कार्यक्रमात बोलत होते.
पर्वती येथील शाहू कॉलेजच्या प्रांगणातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करतांना संस्थेचे अध्यक्ष प्रकाश जगताप यांनी पेढे वाटून उपस्थितांना जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंकल सोनवणे, रमेश राक्षे, राजू दडे, अनिल हतागळे, गणेश जाधव, किशोर खुडे, आकाश पवार, उमेश शिंदे, दरवेश पाटोळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बागवे यांचया हस्ते पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला.
पुढे बोलतांना बागवे म्हणाले की, आज राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त सर्व देशभरातील बहुजनांनी संकल्प करावा की, धर्मांध शक्ती, आरएसएस प्रणीत सरकार सत्तेवर आले आहे, त्यामुळे संसद सारख्या ठिकाणी धर्मांद घोषणा दिल्या जात आहेत. ही अत्यंत निंदनीय बाब असून अशा सरकारला त्याला खाली खेचण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.