नाशिक : बहुजननामा ऑनलाइन – वन्य प्राणी शहरी भागात आल्याचे आढळून आल्यास त्या परिसरात तातडीने संचारबंदी लागू करण्याचा आदेश नाशिक जिल्हा प्रशासनाने काढला आहे. पुण्यात काल रानगवा आढळल्यानंतर त्याला पाहण्यासाठी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे घाबरलेला हा रानगवा सैरभैर होऊन धावू लागला व त्यात तो जखमी होऊन त्याचा मृत्यु झाला होता. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
कोथरुडमधील महात्मा सोसायटीत बुधवारी पहाटे रानगवा आढळून आला होता. यावेळी त्याला पाहण्यासाठी व त्याचे फोटो, व्हिडिओ काढण्यासाठी शेकडो लोकांची गर्दी झाली होती. त्यांच्या आरडाओरडामुळे गवा बिथरला. तो सैरावैरा धावू लागला. त्यात त्याने भिंतीला धडका दिल्याने तो जखमी झाला होता. त्याला गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यु झाला.
वन्य प्राणी शहरात आल्यानंतर काय करावे, या संदर्भातल्या मार्गदर्शक सूचना वन विभागाने काढल्या आहेत. वन्य प्राणी शहरात आल्यास संबंधित परिसरात पोलिसांनी १४४ कलम लावणे आवश्यक आहे. ते लावून तेथील नागरिक सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना वन विभागाने काढल्या आहेत. नाशिक शहरात अनेकदा बिबटे येत असतात. त्यावेळी त्याच्यामागे मोठ्या संख्येने जमाव फिरत असतो. त्यातून हा बिबट्या बिथरुन अनेकांना जखमी करण्याचा प्रकार यापूर्वी घडले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने वन्य प्राणी शहरात आढळून आल्यास परिसरात तातडीने संचारबंदी लावण्याचे आदेश काढले आहेत.