बहुजननामा ऑनलाईन – जम्मू कश्मीर मधून कलम ३७० रद्द केल्यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानने जगातील अनेक देशांकडे मदत मागितली. पण कोणत्याही देशाने त्यांना पाठिंबा दिला नाही. त्यामुळे चारही बाजुंनी निराश झालेले पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान वारंवार भारताला आण्विक युद्धाची धमकी देत असतात. मात्र भारताने अण्वस्त्र हल्ला न करण्याचे धोरण फार आधीच जाहीर केले आहे. पंरतु संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अलीकडे युद्धाची परिस्थिती पाहता आपले धोरण बदलू शकते, असे विधान केले आहे. भारताने अण्वस्त्र हल्ल्याच्या बाबतीत नो फर्स्ट युज या धोरणांतर्गत अण्वस्त्र हल्ला झाल्यासच भारत अण्वस्त्रांचा वापर करेल असे जाहीर केले आहे. पण पाकिस्तानने आण्विक हल्ल्याच्या बाबत असे कोणतेही धोरण जाहीर केलेले नाही.
मात्र पाकिस्तानी सैन भारतीय सैन्याच्या तुलनेत इतके मागे आहे की ते भारतीय सैन्याशी कोणत्याही परिस्थितीत जिंकू शकत नाही. म्हणूनच पाकिस्तान वारंवार अणुयुद्धाचा धमक्या देत असतो. ‘द पाकिस्तानी आर्मीज वे ऑफ वॉर’ या पुस्तकाचे लेखक सी क्रिस्टीन फाई म्हणतात, की पाकिस्तानकडे असे सैन्य आहे जे युद्ध सुरू करु शकते पण ते कधीही जिंकू शकत नाही आणि आण्विक शस्त्रास्त्रे असूनही त्यांचा वापर करू शकत नाहीत. दोन्ही देश अण्वस्त्रे सपंन्न देश आहेत. अणु युद्ध झाले तरी अशा स्थितीत दोन्ही देशांना या युद्धाचा मोठा फटका सहन करावा लागू शकतो. भारत आणि पाकिस्तानमध्ये आण्विक युद्धाची परिस्थितीत अणुबॉम्ब वापरल्यास २.१० कोटी लोक मारले जाऊ शकतात. असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार,तीनही दलातून अणु हल्ला करण्याची क्षमता भारतीय सैन्यदलाकडे आहे म्हणजेच जमीन, आकाश आणि समुद्रावरुन अण्वस्त्र युद्ध करण्यास भारत सक्षम आहे. भारताची आण्विक शक्तीने संपन्न असलेली पाणबुडी आयएनएस अरिहंतही २०१८ भारतीय सैन्यात दाखल झाली आहे. तर भारताची लँड बेस्ड बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नी -३ ची क्षमता ३००० किमीपर्यंत आहे.
पाकिस्तानकडे भारतापेक्षा जास्त अणुबॉम्ब असले तरी ते निश्चित लक्ष्य गाठण्यास असक्षम आहेत. पाकिस्तान नवीन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे विकसित करीत असून सध्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची क्षमता 2000 किमी आहे. पाकिस्तानकडे अण्वस्त्रयुक्त पाणबुडी नाही. मात्र आता भारताकडे ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्र आहे जे जमीन, समुद्र किंवा हवेतून कुठेही मारा करू शकते. हे पाकिस्तानी सैन्य तळांनाही लक्ष्य करू शकते. स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (एसआयपीआरआय) च्या मते पाकिस्तानकडे १४० ते १५० अणुबॉम्ब तर भारताकडे १३० ते १४० अणुबॉम्ब आहेत. भारताकडे तीन हजार ते पाच हजार किलोमीटरची क्षमता असलेले परिचालन क्षेपणास्त्र आहेत. ज्यात अग्नी -3 चाही समावेश आहे.
बुलेटिन ऑफ अॅटोमिक सायंटिस्टच्या म्हणण्यानुसार, भारताकडे पृथ्वी आणि अग्नी श्रुंखलेतील जमीनीवरुन जमीनीवर मारा करणारी ५६ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आहेत. त्यापैकी 53 टक्के (१०६ बॉम्ब) युद्ध सामग्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्याचवेळी के -१५ सागरिका सबमरीन्स बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांमध्ये 12 अण्वस्त्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत. पाकिस्तानचा छोटा भौगोलिक आकार पाहता आण्विक युद्धाच्यावेळी भारत इस्लामाबाद, रावळपिंडी, लाहोर, कराची आणि नौशेरा येथील पाकिस्तानी लष्कराच्या सशस्त्र दलाच्या मुख्य कार्यालयाला लक्ष्य करु शकतो. तर काही तज्ज्ञांच्या मते, जर लाहोर आणि कराचीवर अणुहल्ला झाला तर तो फक्त पाकिस्तानी सीमेपुरता मर्यादित राहणार नसून त्याच्या परिणाम भारतीय आणि अफगाणिस्तान सीमेवर परिणाम होईल.
भारताकडे २५० किलोमीटर क्षमता असणारी पृथ्वी मिसाईल (शॉर्ट-रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्र) २४ अण्वस्त्रे वाहून नेण्यासाठी बनविण्यात आली आहे. ही क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या प्रमुख शहरे लाहोर, सियालकोट, इस्लामाबाद आणि रावळपिंडीला भेदू शकतात. भारताकडे अनुक्रमे २० अग्नि -1 ज्याची क्षमता ७०० किलोमीटर आहे तर ८ अग्नि – २ क्षेपणास्त्राची क्षमता २००० किलोमीटर इतकी आहे. ही क्षेपणास्त्रे पाकिस्तानच्या लाहोर, इस्लामाबाद, रावळपिंडी, मुलतान, पेशावर, कराची, क्वेटा आणि ग्वादर आदी शहरांना उद्व्धस्त करु शकते. अग्नि III, IV आणि V या मोठ्या श्रेणीची क्षेपणास्त्रही पाकिस्तानच्या प्रत्येक भागात पोहोचण्यास सक्षम आहेत परंतु ती चीनशी होणाऱ्या युद्धाच्या वापरासाठी तयार करण्यात आली आहेत.
भारताकडे धनुष नावाचे ३५० किलोमीटर वाहन क्षमता असणारे छोट्या पल्ल्याचे बैलिस्टिक क्षेपणास्त्रही आहे. युद्धसदृश परिस्थितीत भारताकडे असणाऱ्या एकूण आण्विक युद्धसामग्रीपैकी ४५ टक्के युद्धसामग्रीचा वापर करता येऊ शकतो. भारतीय वायुसेनेचा जग्वार फाइटर बॉम्बर १६ अणुबॉम्ब वाहन शकतो तर फ्रान्समध्ये बनवलेला शक्तिशाली ‘मिराज 2000 मध्ये बत्तीस आण्विक बॉम्ब वाहून नेण्याची क्षमता आहे. इंडियास्पेंडच्या ने एप्रिल २०१७ मध्ये दिलेल्या अहवालानुसार पाकिस्तानचे ६६ टक्के अण्वस्त्रे बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांवर तैनात आहेत. ‘तर बुलेटिन ऑफ द अॅटोमिक सायंटिस्ट डेटा’च्या अंदाजानुसार, पाकिस्तानच्या ६६ टक्के अणुसामग्री ८६ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांवर तैनात करण्यात आली आहेत.
पाकिस्तानच्या हत्फ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या साखळीनेही प्रचंड नुकसान करु शकते. मुंबईतील थिंक टँकचे सदस्य समीर पाटील यांच्या मते, जर पाकिस्तानने मध्यम क्षमतेच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला करायचा विचार केला तर भारताची ४ महत्वाची शहरे म्हणजे नवी दिल्ली, मुंबई, बेंगलुरू आणि चेन्नईला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करतील. पाटील यांनी वर्तविलेल्या अंदाजनुसार पाकिस्तानची मध्यम-श्रेणीची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे भारतीय सैन्याच्या मेजर कमांडलाही लक्ष्य करु शकते.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स स्टडीज (एनआयएएस) बेंगलुरूच्या २००६ अहवालानुसार पाकिस्तानचे निम्म्याहून अधिक अणुबॉम्ब गौरी क्षेपणास्त्रातून सोडले जाऊ शकतात. या क्षेपणास्त्राची क्षमता १३०० किमी आहे आणि त्यातून हल्ला केल्यास भारतातील दिल्ली, जयपूर, अहमदाबाद, मुंबई, पुणे, नागपूर, भोपाळ आणि लखनऊ या शहरांती राखरांगोळी होऊ शकते. पाकिस्तानकडे असलेल्या शाहीन (फाल्कन) II मधून डागता येणारी सुमारे 8 वॉरहेड्स आहेत. या मध्यम श्रेणीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची क्षमता २५०० किमी असून पूर्व किनारपट्टीवरील कोलकतासह भारतातील बहुतेक शहरांना उद्ध्वस्त करण्याची यात क्षमता आहे.
तर १६ वॉरहेड ही कमी लांबीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राद्वारे डागले जाऊ शकतात. ज्याची मारक क्षमता २५० ते ३५० किमी असून लुधियाना, अहमदाबाद आणि दिल्ली हे त्याचे लक्ष्य बनू शकते. पाकिस्तानकडे अंदाजे १६ अणुबांधित शॉर्ट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आहेत ज्यात शाहीन 1 (फाल्कन) ची क्षमता ७५० किमी आहे. याची पोहोच लुधियाना, दिल्ली, जयपूर आणि अहमदाबाद पर्यंत असेल. पाकिस्तानकडे जवळपास 660 किमी अंतरावरील नासर क्षेपणास्त्रे आहेत. या आण्विक क्षेपणास्त्राचा वापर रणनितीक खेळीसाठी भारतीय सैन्याविरुद्ध करता येऊ शकतो. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब ठेवण्यास सक्षम अशी ८३५० किलोमीटरची बाबर क्रूझ क्षेपणास्त्रही आहेत. पाकिस्तानच्या असणाऱ्या एकूण अणुबॉम्बपैकी 28 टक्के (सुमारे 36 अणुबॉम्ब) अणुबॉम्बचा वापर युद्धाच्या वेळी केला जाऊ शकतो. अमेरिका निर्मित एफ -१६ ए / बी विमान एकाच वेळी २४ बॉम्ब टाकू शकते, तर फ्रान्समध्ये बनविण्यात आलेला मिराज III/V मध्ये एकाचवेळी १२ बॉम्ब टाकण्याची क्षमता आहे.