बहुजननामा ऑनलाईन- कोरोना संकटात बेरोजगार झालेल्या औद्योगिक कामगारांसाठी सरकारने चांगली बातमी दिली आहे. अशा कर्मचार्यांना त्यांच्या मागील तीन महिन्याच्या पगाराच्या सरासरीच्या सुमारे 50 टक्केपर्यंत रक्कम अनअॅम्प्लॉयमेंट बेनिफिट देण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे सुमारे 40 लाख कामगारांना फायदा होऊ शकतो. सरकारने नियमांमध्ये लवचितकता आणून हे ठरवले आहे की, कोरोना संकटात नोकरी गमावलेल्या औद्योगिक कामगारांना त्यांच्या तीन महिन्याच्या वेतनाच्या अर्धे म्हणजे 50 टक्के पर्यंत बेरोजगारी मदत केली जाणार आहे. हा फायदा त्या कामगारांना मिळेल, ज्यांची या वर्षात 24 मार्च ते 31 डिसेंबरपर्यंत नोकरी गेली आहे.
ईएसआयसीच्या बैठकीत प्रस्ताव
बिझनेस वृत्तपत्र मिंटनुसार, हा प्रस्ताव गुरुवारी कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) बैठकीत ठेवण्यात आला होता. ईएसआयसी कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी संस्था आहे, जी 21,000 रुपयांपर्यंत कर्मचार्यांना ईएसआय स्कीम अंतर्गत विमा देते.
ईएसआयसी बोर्डाचे सदस्य अमरजीत कौर यांनी सांगितले की, या निर्णयामुळे ईएसआयसी अंतर्गत विमा असलेल्या योग्य कामगाराला निम्मा पगार मिळणार आहे.
कसा मिळणार फायदा
ईएसआयसी आपल्या डाटानुसार बेरोजगार कामगारांना हा फायदा देईल, यासाठी कर्मचारी ईएसआयसी शाखेत जाऊन थेट जाऊन सुद्धा अर्ज करू शकतात आणि योग्य व्हेरिफिकेशननंतर त्याच्या खात्यात थेट रक्कम पोहचेल. यासाठी आधार नंबरचा उपयोग केला जाईल.
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी नुसार कोरोना संकटामुळे सुमारे 1.9 कोटी पेक्षा जास्त लोकांच्या नोकर्या गेल्या आहेत. केवळ जुलै महिन्यात 50 लाख लोक बेरोजगार झाले आहेत. मात्र, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनुसार, जून महीन्यात 4.98 लाख लोक औपचारिक कार्यबळाशी जोडले गेले आहेत.