मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – पुणे येथे शनिवारवाड्यावरील झालेल्या एल्गार परिषद प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या ऍड. सुधा भारद्वाज यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली व न्यामूर्ती नितीन सांबरे यांनी या अर्जाची दखल घेतली. मात्र सरकारी वकील गैरहजर राहील्यामुळे न्यायालयाने याचिकेची सुनावणी 27 फेब्रुवारीपर्यंत तहकूब ठेवली.
पुण्यात 31 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या एल्गार परिषदेनंतर 1 जानेवारी 2018 रोजी भीमा-कोरेगावामध्ये हिंसाचाराचा प्रकार घडला. त्यानंतर एल्गार परिषदेतील सहभागामुळेच सुधा भारद्वाज यांच्यासह समाजसुधारकांना पुणे पोलिसांनी अटक केली. ऑक्टोंबर महिन्यात त्यांनी जामीनासाठी केलेला अर्ज पुणे न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता उच्च न्यायालयात धाव घेऊन ऍड. चौधरी यांच्यामार्फत अर्ज केला आहे.
या अर्जावर न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्यासमोर दिनांक १८ सोमवारी २०१९ रोजी सुनावणी झाली. यावेळी केवळ पत्रांच्या पुरावाच्या आधारे अटक बेकायदा आहे. कायद्यानुसार पुरावा म्हणून पत्र ग्राह्य धरता येणार नाही. असा युक्तीवाद करताना जामीन देण्याची विनंती केली. याची दखल घेऊन न्यायालयाने याचिकेची पुढील सुनावणी 27 फेब्रुवारीपर्यंत तहकूब ठेवली.