बहुजननामा ऑनलाईन – राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी नियम पाळा लॉकडाऊन टाळा असं सांगत राज्यातील जनतेला इशारा दिला आहे. शरद पवारांच्या प्रकृतीची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी लॉकडाऊनवर भाष्य केलं.
‘सर्व प्रशासनाला बेड वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत’
राजेश टोपे म्हणाले, बेड्स उपलब्ध नाहीत अशी परिस्थिती मुंबईत किंवा जिल्ह्यात कुठेही नाही. काही ठराविक रुग्णालयात जिथे खूप मागणी असते तिथे अडचणी निर्माण होत आहेत. सध्या मुंबईत आयसीयुचे 400 बेड्स, ऑक्सिजनचे 2160 बेड्स आणि व्हेंटीलेटरचे 213 बेड्स आहेत. सर्व प्रशासनाला बेड वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यात कोरोनाचे बेड्स सर्वत्र उपलब्ध आहेत. काही विशिष्ट रुग्णालयांमध्ये गंभीर रुग्णांसाठी बेड उपलब्ध नसल्याची माहिती मिळाल्यानंतर बेड्स वाढविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच ऑक्सिजनचा वापर ८०% आरोग्यासाठी व २०% उद्योगासाठी करण्याचे निर्देश दिले आहेत- ना. @rajeshtope11 pic.twitter.com/o6YJ7ODWTR
— NCP (@NCPspeaks) March 31, 2021
‘निर्बंध अधिक कडक करण्यासंबंधींची पावलं राज्य शासन उचलणार आहे, त्यादृष्टीनं मानसिकता ठेवावी’
पुढं बोलताना राजेश टोपे म्हणाले, लसीकरण वेगानं सुरू आहे. हार्ड इम्युनिटी आणण्याचा प्रयत्न असून त्यातून रुग्णसंख्या कमी होताना दिसेल. लॉकडाऊनच्या बाबतीत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यासंबंधी चर्चा नेहमी सुरू असते. निर्बंध अधिक कडक करण्यासंबंधींची पावलं राज्य शासन उचलणार आहे. त्यादृष्टीनं लोकांनी मानसिकता ठेवली पाहिजे. गर्दी टाळावी हाच दृष्टीकोन आहे. गर्दी होणाऱ्या सर्व ठिकाणी कठोर निर्बंध आणण्यासाठी नियोजन करत आहोत. अंतिम झाल्यानंतर त्याबद्दल कळवलं जाईल.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी वेळोवेळी सरकारकडून उपाययोजना केल्या जातात. पण लोक जर बेफिकीरीने वागणार असतील तर सरकारला नाईलाजाने कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे ना. @rajeshtope11 यांनी स्पष्ट केले. #CoronaUpdate
— NCP (@NCPspeaks) March 31, 2021
‘…अशा लोकांना कोणत्याही परिस्थितीत कोरोना होण्याचं कारण नाही’
राजेश टोपे असंही म्हणाले की, ज्यांनी कटाक्षानं मास्क वापरला आहे, गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टेंसिंग ठेवत आहेत अशा लोकांना कोणत्याही परिस्थितीत कोरोना होण्याचं कारण नाही. कारण कोरोना आपल्या तोंडातून निघणाऱ्या शिंतोड्यावाटे पसरतो. त्यामुळं मास्क घातल्यानंतर आपण संसर्ग पसरवत नाही आणि स्वत:सुद्धा सुरक्षित राहू शकतो. मास्क न घातल्यास मोठ्या पद्धतीनं संसर्ग होण्याची भीती असते. आपल्यालाही संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असंही त्यांनी सांगितलं.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी वेळोवेळी सरकारकडून उपाययोजना केल्या जातात. पण लोक जर बेफिकीरीने वागणार असतील तर सरकारला नाईलाजाने कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे ना. @rajeshtope11 यांनी स्पष्ट केले. #CoronaUpdate
— NCP (@NCPspeaks) March 31, 2021
‘नियम पाळा आणि लॉकडाऊन टाळा एवढंच मला सांगायचं आहे’
राजेश टोपे म्हणाले, संख्या अशीच राहणार असेल आणि लोक बेफिकिरीनं वागणार असतील निर्बंध अधिक कडक करण्यासंदर्भातील निर्णय घ्यावाच लागेल. नियम पाळा आणि लॉकडाऊन टाळा एवढंच मला सांगायचं आहे असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.