नवी दिल्ली वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील आमदार विक्रम सैनी यांच्यानंतर आता हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी काश्मीरी मुलींबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. काश्मीर पुनर्रचना विधेयक मंजूर झाल्याने आता आम्ही काश्मीरी सुन आणू शकतो. असं बेजबाबदार वक्तव्य मनोहरलाल खट्टर यांनी केलं आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
काय म्हणाले मनोहरलाल खट्टर ?
आधी आमच्याकडील लोक म्हणत होते की बिहारमधील सुन आणणार. आता लोक म्हणू लागलेत की काश्मीरचा रस्ता मोकळा झाला आहे. आता काश्मीरमधील मुली आणू असे मनोहरलाल खट्टर म्हणाले. आपण केलेल्या वक्तव्यामुळे वाद होण्याची शक्यता दिसल्यानंतर त्यांनी आपलं वक्तव्य मस्करीत घेण्याचं आवाहनही केलं. या कार्यक्रमात विशेष म्हणजे खट्टर यांनी बेटी बचाओ, बेटी बचाओ या विषयावर चर्चादेखील केली. त्यासोबतच हरिय़ाणातील मुलांच्या तुलनेत मुलींचं प्रमाण कमी असल्याबाबत चिंताही त्यांनी व्यक्त केली होती. तत्पुर्वी उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगरचे भाजपचे आमदार विक्रम सैनी यांनीदेखील काश्मीरमधील मुलींबाबत वादग्रस्त विधान केलं होतं.
काय म्हणाले होते विक्रम सैनी ?
देशातील मुस्लीमांनी आता खुश व्हायला पाहिजे. कारण ते आता न घाबरता गोऱ्या काश्मीरी मुलींशी लग्न करू शकतात. एवढंच नाही तर भाजपचे अविवाहित नेतेही काश्मीरला जमीन खरेदी करू शकतात. आणि लग्न करू शकतात. भाजपमध्ये जेवढे अविवाहित नेते आहेत. ते सर्व काश्मीरला जाऊन लग्न करू शकतात. आम्हाला काही आक्षेप नाही. एवढंच काय तर भाजपच्या मुस्लीम कार्यकर्त्यांनीही खुश व्हायला पाहिजे. कारण ते आता गोऱ्या मुलींशी लग्न करू शकतात.