बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शेअर बाजाराविषयी माहिती ठेवणाऱ्यांसाठी ब्रोकर हर्षद मेहता(Harshad Mehta) काही नवीन नाव नाही. हर्षद मेहता हा तोच व्यक्ती आहे, ज्याने 1992 साली देशाच्या आर्थिक बाजारामध्ये पेच निर्माण केला. 1991 मध्ये देशात आर्थिक सुधारणांची सुरुवात झाली होती की, हर्षद मेहताने संपूर्ण खेळच फिरविला, 1990-1992 भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी परिवर्तनाचा काळ होता. दरम्यान, आर्थिक बाजारात एवढा मोठा घोटाळा झाला की शेअर्स खरेदी व विक्रीच्या प्रक्रियेत ऐतिहासिक बदल पाहिले गेले. 4 हजार कोटींचा हा घोटाळा हर्षद मेहताने(Harshad Mehta) केला होता. या घोटाळ्यानंतर सेबीला शेअर बाजाराच्या गडबडी आणि धांधलीवर लक्ष ठेवण्याचे अधिकार देण्यात आले.
कोण होता हर्षद मेहता ?
29 जुलै 1954 रोजी गुजरातच्या राजकोटमधील पलेन मोती येथे जन्मलेल्या हर्षद मेहताचे बालपण मुंबईतील कांदिवली येथे गेले. होली क्रॉस बेरॉन सेकंडरी स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्याने लाजपत राय कॉलेजमधून बी.कॉममध्ये पदवी प्राप्त केली. हर्षदने सुरुवातीला आठ वर्षे छोटी नोकरी केली. न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड येथे सेल्स पर्सन म्हणून त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर त्याने ‘हरिजीवन दास नेमिदास सिक्युरिटीज’ या दलाली फर्ममध्ये काम केले. त्याच वेळी 1984 मध्ये हर्षदने स्वत:ची ‘ग्रो मोअर रिसर्च अँड अॅसेट मॅनेजमेंट’ ही कंपनी तयार केली. या बरोबरच त्याने दलाल म्हणून बीएसईमध्ये सदस्यत्वही घेतले. हर्षदने प्रसार परिजीवादास यांच्या छत्रछायाखाली शेअर बाजाराचे गुण शिकले होते. मेहताला शेअर बाजारातील ‘बिग बुल’ असे म्हणतात. कारण त्याने ‘बुल रन’ सुरू केले होते.
कसा अमलात आला घोटाळा
हर्षद मेहता बँकिंग नियमांचा फायदा घेत बँकांना काही न सांगता आपले कोट्यवधी रुपये स्टॉक मार्केटमध्ये टाकत असत. तो दोन बँकांमधील मध्यस्थ म्हणून काम करायचा आणि 15 दिवसांसाठी बँकांकडून कर्ज घेत असे. कर्जाच्या पैशातून तो प्रचंड नफा कमावत असे आणि तो बँकेत परत करत असे. हर्षद एका बँकेतून बनावट बीआर बनवत असे आणि दुसर्या बँकेतून आरामात पैसे काढत असे. एप्रिल 1992 मध्ये हर्षदचा खुलासा उघडकीस आला आणि बाजारात घसरण सुरू झाली. त्याच वेळी, मेहतावर 72 फौजदारी आरोप ठेवण्यात आले आणि दिवाणी खटले दाखल करण्यात आले. 1990 साली स्टॉक मार्केटमध्ये मोठी तेजी आली, ज्याचे कारण ब्रोकर हर्षद मेहता होता. याच कारणास्तव त्याला शेअर बाजारामध्ये ‘बिग बुल’ असे नाव देण्यात आले.
शिक्षा आणि मृत्यू
हर्षदवर अनेक फौजदारी गुन्हे दाखल असले तरी 1992 च्या घोटाळ्याचा तो एकमेव दोषी असल्याचे दिसून आले. या घोटाळ्यात दोषी ठरल्यावर हायकोर्टाने त्याला पाच वर्षांची शिक्षा आणि 25 हजार रुपये दंड ठोठावला. हर्षद मुंबईतील ठाणे तुरुंगात शिक्षा भोगत असताना त्याची प्रकृती खालावली. 31 डिसेंबर 2001 रोजी त्याच्या छातीत दुखू लागले व त्याला ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.
कुटुंबाकडून करण्यात आली वसुली
दरम्यान, घोटाळ्याच्या 25 वर्षांनंतरही हर्षदच्या कुटुंबीयांकडून याची वसुली करण्यात आली. संरक्षकांनी हर्षदची संपत्ती विकली आणि बँका आणि आयकरांच्या नावावर 6 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम जाहीर केली. त्याचवेळी हर्षदच्या कुटुंबीयांनी 2017 मध्ये 614 कोटी रुपये बँकेत भरले.