नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने एक चांगली बातमी आहे़ लवकरच केंद्र सरकार निवृत्तीच्या वयात वाढ करण्याचा विचार करीत आहे. स्त्री पुरुषांचे आर्युमान वाढत चालले असल्याने नजीकच्या भविष्यात निवृत्तीचे वय वाढविणे अपरिहार्य ठरणार असून त्याचा विचार आतापासूनच केला तर त्याचे नियोजन करणे सोपे जाणार आहे. केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढविण्याचा विचार करीत असून त्यासाठी दहा वर्षाचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयात वाढ होण्याची शक्यता आहे.
संसदेत सादर केलेल्या चालू वित्त वर्षाच्या आर्थिक पाहणी अहवालात नमूद केले गेले. हा अहवाल म्हणतो की, पुरुष आणि महिलांचे संभाव्य वयोमान भविष्यातही आणखी वाढणार असल्याने, निवृत्तीचे वय वाढविण्याचा विचार केला जाऊ शकेल. असे करणे परवडणाऱ्या पद्धतीने पेन्शन योजना राबविणे यामुळे शक्यहोईल. तसेच उतारवयातील महिलांचा नोकरी-व्यवसायांमधील सहभागही त्यामुळे वाढण्यास मदत होईल.
अहवाल म्हणतो की, असे करण्याच्या एक दशक आधी त्याचे संकेत देणे सयुक्तिक ठरेल. जेणेकरून नोकरदार आपल्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याची आखणी करण्याची तयारीही आधीपासून करू शकतील. शिवाय पेन्शन व अन्य निवृत्तीलाभ देण्यासाठी लागणाऱ्या निधीची उभारणी करणेही यामुळे सोपे जाईल.