सावंतवाडी/सिंधुदुर्ग : बहुजननामा ऑनलाइन – काही महिन्यापूर्वी अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parh Pawar) यांना सल्ला देताना राजकारण करण्यापेक्षा शेती किंवा उद्योग धंदा केलेला बरा असे म्हटले होते. त्यांच्या वक्तव्याची आठवण करुन देत भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. निलेश राणे यांनी ट्विट करुन ‘अजितदादा राजकारण सोडून शेती कधी करताय ?’ असा प्रश्न विचारला आहे. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान अजित पवार यांनी केलेल्या एका वक्तव्याचा संदर्भ देत निलेश राणे यांनी ट्विट करत अजित पवारांवर निशाणा साधला.
३ पक्षाचे सरकार आले आणि हाता तोंडाचा घास गेल्याने दुःख झालंय असं आज अजित पवार बोलले. अजित पवार साहेब तुम्ही PC मध्ये रडता, मोबाईल बंद करून लपून बसता, बिन खात्याचे ३ महिने मंत्री राहण्याचा मान तुमचाच. तुम्ही इतके दुःखात होतात की राजकारण सोडून शेती करणार होतात त्याचं काय झालं??
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 15, 2020
निलेश राणे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, तीन पक्षाचे सरकार आले आणि हाता तोंडाचा घास गेल्याने दु:ख झालंय असं आज अजित पवार बोलले. अजित पवार साहेब तुम्ही PC मध्ये रडता, मोबाईल बंद करुन लपून बसता, बिन खात्याचे तीन महिने मंत्री राहण्याचा मान तुमचाच. तुम्ही इतके दु:खात होतात की राजकारण सोडून शेती करणार होतात त्याचं काय झालं ? असे ट्विट करत राणे यांनी अजित पवार यांच्या टीका केली आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या काही आठवडे आधीच अजित पवार यांनी 27 सप्टेंबरला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विधान भवनात जाऊन आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांचा कोणाशीच संपर्क झाला नव्हता. राजीनाम्या संदर्भात प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणाची घसरणारी पातळी पाहून अजितने आपल्या मुलांनाही शेती करण्याचा सल्ला दिल्याचे म्हटले होतं.