ठाणे : बहुजननामा ऑनलाईन – मुंबईतील मेट्रो प्रकल्प केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या उध्दटपणामुळे पाच वर्षांसाठी लांबला त्यामुळे मुंबईकरांना सुमारे 5 हजार कोटीचा फटका बसल्याची घणाघाती टीका भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी केली आहे.
राज्य सरकारने कांजूरमार्ग येथील केंद्र सरकारच्या जागेवर मेट्रोचे काम करणे खोटेपणाचे असून याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे. तसेच मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे बालिशपणा करत असल्याचे सांगत राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाण्यातील रेमंड कंपनीसमोर 13 मजल्याचे दोन टॉवर बांधले व OC न घेताच सर्व फ्लॅटची विक्री केली आहे. ठाणे महापालिकेने 2008 साली सदर बांधकाम अनधिकृत ठरवून पाडण्याचे आदेश दिले होते. परंतु आजतागायत त्यावर कारवाई झाली नाही. आ. सरनाईक यांनी सामान्य नागरिकांची फसवणूक केली असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. त्याच अनुशंगाने येत्या शुक्रवारी (दि. 18) सोमया ठाण्यातील वर्तक नगर पोलिस स्टेशनला सरनाईक विरोधात फ़ौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी जाणार आहेत.