नागपूर बहुजननामा : अकरावी प्रवेशाच्या रिक्त जागांची संख्या वाढल्याने गेल्या वर्षी शंभराच्या वर शिक्षक अतिरिक्त ठरले होते. यंदा देखील हीच परिस्थिती निर्माण झाल्याने महाविद्यालयांमध्ये पाचशे शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यंदा अकरावीच्या ५८ हजार २४० जागांसाठी फक्त ३० हजारांवर नोंदणी झाली. दुसऱ्या फेरी अखेर २० हजार ८२९ जागांवर प्रवेश दिले गेले. तिसऱ्या फेरीला उद्या सुरवात होणार असून त्यानंतर विशेष फेरी देखील घेण्यात येईल. साधारणपणे १२० विद्यार्थ्यांच्या एका तुकडी साठी तीन शिक्षकांचा समावेश असतो. परंतु संयुक्त शाखांचे महाविद्यालय असल्यास साडेचार शिक्षकांची मान्यता असते, परंतु त्या महाविद्यालयांना तीन शिक्षकांचा समावेश होतो. यावर्षी कला शाखेसाठी ९ हजार १६ जागांपैकी १ हजार ५८१ , वाणिज्य शाखा १७ हजार ७४४ जागांपैकी ५ हजार १४४ आणि विज्ञान शाखेत २७ हजार ६० जागांपैकी १३ हजार ८०५ प्रवेश अशी नोंदणी झाली. त्यामुळे रिक्त जागांची संख्या ३७ हजारांपेक्षा जास्त आहे.
त्यामुळे तिसऱ्या फेरी नंतर देखील जवळपास ३० हजार जागा रिक्त राहुन २५० तुकड्यांवर मोठा परिणाम होणार आहे. परिणामी पाचशे शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याची शक्यता आहे. यामुळे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याउलट ग्रामीण भागातील महाविद्यालय प्रवेश संख्या पूर्ण झाल्याने शहरातील महाविद्यालयांवर त्याचा परिणाम झालेला दिसून येतो. त्यामुळे काही महाविद्यालये सोडली तर इतर महाविद्यालयात रिक्त जागांची संख्या जास्त प्रमाणावर आहे.