बहुजननामा ऑनलाईन – मुंबई, सांगली, कोल्हापूरात महापुराच थैमान, तर मराठवाड्यातील अनेक जिल्हे कोरडे ठाक. ऑगस्ट महिना उलटून गेला तरी पावसाचा पत्ता नाही. जून महिन्यात झालेल्या पावसावर कापूस, सोयाबीन, मूग उडीद पिकांची लागवड केली पण पावसाने पुन्हा पाठ फिरविली. पावसाविना खरीपाची पिक तर जळून गेली आता रब्बीची पेरणी करण्यासाठी बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील २५ गावातील शेतकऱ्यांनी दोन हजार हेक्टरवरील पिकांवर स्वतःच्या हातांनी नांगर फिरवला आहे.
एकीकडे ओला दुष्काळ तर दुसरीकडे कोरडा दुष्काळ या दुष्काळाचे संकट पावसाविना अजूनच दाटच होताना दिसत आहे. बीड जिल्ह्यात दुष्काळाचे संकट पुन्हा एकदा गडद झाले आहे. त्यात बीड शहराला पाणी पुरवठा करणारा बिंदूसरा प्रकल्पही कोरडा ठाक पडला आहे. दुष्काळ जणू त्यांच्या पाचवीला पुजल्यासारखा त्यांची पाठ सोडत नसल्याने आता शेतकरीही हवालदिल झाला आहे. थोड्याशा पावसावर खरीपाच्या पिकांची लागवड तर केली. पण पेरणीनंतर पाऊसच झाला नाही. मराठवाड्यातही दुष्काळाच्या झळा बसत आहेत. पावसाविना डोळ्यादेखत पिके जळून गेली. जनावरांच्या आणि माणसांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर होत चालला आहे. पावसाळ्यात टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. जनावरांसाठी चारा छावण्या सुरु आहेत. तर बीडमधील लहान मोठे १४४ प्रकल्प मृत साठ्यात आहेत. त्यामुळे खरीप पिकांचे पंचनामे करुन ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
घर कसं चालवायच असा प्रश्न बीडमधील पांडुरंग यांनी विचारला आहे. पांडुरंग यांची वासनवाडी शिवारातील आठ एकराची शेती. त्यांनी कापूस मका आणि बाजरी लावली. एकरी दहा हजार रुपये खर्च आला. पाऊस न पडल्याने सगळी पिकं जळून गेली. आधीच दुष्काळ त्यात शेतीसाठी लाखभर रुपये खर्च केले. पण हातात काहीच आल नाही.खायला टाकायला काही नाही म्हणून ७० हजार रुपयाची जनावरे ३५ हजारांना विकल्याचं पांडुरंग गोरे यांनी सांगितलं. मुलांची शिक्षणं आणि घर कसं चालवायचं असा त्यांच्यापढे आता प्रश्न आहे.