बहुजननामा ऑनलाइन – कृषी उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य विधेयक, तसेच कृषी मूल्य आश्वासन आणि कृषी सेवा करार विधेयक केंद्रातील मोदी सरकारने पावसाळी अधिवेशनात बहुमताच्या जोरावर आवाजी मतदानाने संमत केली. त्या पार्श्वभूमीवर देशभरातून आता विरोधक आणि शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. सरकारने बहुमताच्या जोरावर संसदेत कृषी विधेयके मंजूर केली असली तरी त्यातून शेतकऱ्यांचे हित साधले जाणार नाही, अशी भूमिका घेत अखिल भारतीय किसान संघर्ष समितीने काही दिवसांपूर्वी ‘भारत बंद’ ची हाक दिलेली.
देशातील विविध राजकीय संघटना, राजकीय पक्ष आणि शेतकरी भारत बंद मध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर आता मोदी सरकारविरुद्ध शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीच्या उच्च सुरक्षा विभागाअंर्तगत येणाऱ्या इंडिया गेटजवळ काही लोकांनी टॅक्टरला आग लावल्याची घटना समोर आली आहे. कृषी विधेयकाविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून टॅक्टरला आग लावून त्यांनी निषेध व्यक्त केला.
#UPDATE: Five people – residents of Punjab – detained in connection with the protest and burning of a tractor near India Gate in Delhi. Legal action initiated. https://t.co/IMtkZge2l7
— ANI (@ANI) September 28, 2020
पोलिसांनी पाच जणांना घेतलं ताब्यात
टॅक्ट्ररला आग लावल्याचा एक व्हिडीओ समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं असून अधिक तपास करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनजोत सिंग, रमनदीपसिंग सिंधू, राहुल, साहिब आणि सुमित अशी आरोपींची नाव असून, हे सर्व आरोपी पंजाब युवक काँग्रेसचे नेते आहेत. तसेच इंडिया गेट जवळून एक इनोव्हा कार सुद्धा पोलिसांनी जप्त केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर
आठवड्याभरापासून राजकीय वादळ निर्माण करणाऱ्या तिन्ही कृषी विधेयकांवर रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे कृषी क्षेत्रातील बदलांचे कायदे प्रत्यक्षात अस्तित्वात आले. दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी हा ‘काळ दिवस’ असल्याची संतप्त प्रतिक्रिया भाजपाची साथ सोडलेल्या शिरोमणी अकाली दलाने व्यक्त केली.