नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानी सैन्यानं शुक्रवारी जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरपासून गुरेज सेक्टरपर्यंत नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात पाच जवान शहीद झाले. तर काही नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या नापाक कारवायांना भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे दरम्यान एलओसीच्या दोन्ही बाजूला होणारी जीवितहानी पाहून वाईट वाटते. भारत आणि पाकिस्तान दोघांनी राजकीय अपरिहार्यता बाजूला ठेवून आता चर्चा सुरू करावी असा सल्ला पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाच्या नेत्या आणि जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी दिला आहे.
सीमेवरील अशा घटना रोखण्यासाठी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी शस्त्रसंधी करार केला होता. त्याची आठवण करून देत तो करार पूर्ववत करावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
शुक्रवारी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारतानेही प्रतिहल्ला केला. यात पाकिस्तानी लष्कराचे ११ सैनिक मारले गेले तर १२ जण जखमी झाले. याशिवाय पाकिस्तानी सैन्याचे बंकर आणि लॉन्च पॅडदेखील उद्ध्वस्त झाले. नियंत्रण रेषेवर वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तान विरोधात भारतानं आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला भारताकडून समन्स बजावण्यात आलं आहे.
पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्यांसमोर केला निषेध
उत्सव काळात नियंत्रण रेषेवर सुरू असलेला बेछूट गोळीबार आणि त्या माध्यमातून शांतता भंग करण्याचा प्रयत्न अतिशय निंदनीय आहे. पाकिस्तानी सुरक्षा दलांकडून भारताच्या सीमावर्ती भागातील नागरिकांना नाहक लक्ष्य केलं जात असून कठोर शब्दात भारतानं निषेध नोंदवल्याचे परराष्ट्र मंत्रालया सांगितले. एवढेच नाहीत तर हा निषेध पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्यांसमोर करण्यात आला आहे. पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या चार्ज डी अफेयर्सना समन्स बजावण्यात आल आहे, अशी माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली.
…….तर शस्त्र उचलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही
मेहबूबा मुफ्ती यांनी बिहारमधील निवडणुकीवर भाष्य करत तेजस्वी यादव यांचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्या लहान असूनही तेजस्वी यांनी बिहारमध्ये अन्न, वस्त्र, रोजगार, निवारा आणि कलम ३७०, ३५ अ, जमीन खरेदी चालू दिले नाही. आज यांची वेळ आहे. उद्या आपल्या सर्वांची वेळ येईल. अमेरिकेत ट्रम्प यांच्यासोबत जे झालं तेच यांच्यासोबत देखील होणार आहे. जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमधील लोकांची जमीन आणि नोकरीचा अधिकार हिरावून घेतला आहे. तरुणांना नोकरी मिळावी नाही तर शस्त्र उचलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे.