बहुजननामा ऑनलाइन टीम – रिपब्लिक टीव्हीचे ( Republic TV) संपादक अर्णब गोस्वामी ( Arnab Goswami) यांना अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी अटक ( Arrest) करण्यात आली आहे. या प्रकरणात न्यायालयाने अंतरिम जामीन ( Bail) देण्यास नकार दिल्याने अर्णब गोस्वामी यांना जेलमध्येच राहावे लागणार आहे. त्यानंतर आता या प्रकरणातील 2019 सालचा एक क्लोजर रिपोर्ट समोर आला आहे. त्यावरून, पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार या प्रकरणी सुरेश वरडे यांच्याद्वारे करण्यात आलेल्या तपासात या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांच्यासह अटक करण्यात आलेल्या इतर दोघांकडून अन्वय नाईक यांना पैसे येणे होते. त्याचबरोबर नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आल्याचे या रिपोर्टमध्ये कुठेही आढळून न आल्याचं म्हटलं आहे.
त्याचबरोबर विशेष म्हणजे अन्वय नाईक ( Anvay Naik) हे गेल्या 6 ते 7 वर्षांपासून आर्थिक संकटात होते. त्यामुळेच, अन्वय यांनी सुरुवातील आपल्या आईचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वत: आत्महत्या केली. यासंदर्भात झी न्यूजने इंडियन एक्स्प्रेसच्या हवाल्याने वृत्त दिले आहे. या प्रकरणात पोलिसांनी मागीलवर्षी तयार करण्यात आलेल्या क्लोजिंग रिपोर्टनुसार सत्र न्यायालयात 25 पानांचा अहवाल सादर केला होता. त्यानुसार, शेख आणि सारडा यांच्यावर अन्वय नाईक यांचे देणे बाकी होते. मात्र, ही सर्व बाकी कॉनकॉर्ड डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने अर्धवट काम सोडल्यामुळे किंवा कामाचा दर्जा उचित नसल्याने देण्यात न आल्याचं सांगण्यात आलं आहे.
नाईक कुटुंबीयांचा अधिकाऱ्यांवर आरोप
या प्रकरणी आधी तपास अधिकारी असलेले सुरेश वरडे यांच्यावर नाईक कुटुंबीयांनी आरोप केले होते. यामध्ये वरडे यांनी हा खटला अविश्वासार्ह बनविण्यासाठी आणि तक्रार वापस घेण्यासाठी एका अर्जावर सही करण्यासाठी धमकावल्याचं नाईक कुटुंबीयांना म्हटलं आहे. त्यामुळे, जानेवारी महिन्यातच हा खटला बंद करण्यात आला. आता, याप्रकरणी वरडेंना चौकशीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे यामध्ये त्यांचा दावा किती खरा आहे याचादेखील तपास होण्याची शक्यता आहे.
अर्णब गोस्वामींनी दिला जबाब
या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांनी मुंबईमधील पोलीस स्टेशनमध्ये आपला जबाब नोंदवला होता. तर इतर आरोपींनी अलिबागमधील पोलीस स्टेशनमध्ये आपला जबाब नोंदवला होता. यामध्ये अर्णब गोस्वामी यांनी आपल्या जबाबात इंटेरियर डिझाईनरकडून समाधानकारक काम झालं नसल्याचं म्हटलं आहे. नियमित कालवधीत काम पूर्ण झाले नाही, तसेच कामाचा दर्जाही खालवला होता, न्यूज रूममध्ये पानी गळत होते. तसेच, मी देण्या-घेण्याच्या व्यवहारात बारकाईने पाहत नव्हतो. 21 ऑक्टोबर 2017 रोजी आम्ही पैसे दिले होते. त्यावेळी 85 ते 90 टक्के रक्कम आम्ही दिली होती. बाकीचे पैसे काम पाहिल्यानंतर देण्यात येणार होते,असंदेखील अर्णब गोस्वामी यांनी आपल्या जबाबात म्हटले होते.