बहुजननामा ऑनलाइन टीम – पोलिसांच्या बदल्यांवरुन राज्य सरकारसोबत झालेल्या वादानंतर पुन्हा केंद्रात परत जाण्याचा निर्णय घेणाऱ्या पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल(DGP Subodh Jaiswal ) यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) महासंचालपदी बुधवारी नियुक्ती करण्यात आली. मात्र, सुबोध जयस्वाल यांच्या प्रतिनियुक्तीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील सरकार हे पोलीस खात्याच्या कारभारात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
पोलीस महासंचालक यांच्या प्रतिनियुक्तीवरुन देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीका करताना म्हटले, मुख्यमंत्र्यांनी देखरेखीचे काम करणं अपेक्षित असतं. मात्र, बदलीपासून प्रत्येक गोष्टींमध्ये सध्या हस्तक्षेप होताना दिसत आहे. त्यामुळे सरकारच्या कारभाराला कंटाळूनच महासंचालकांनी प्रतिनियुक्ती स्विकारली असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच ही परिस्थिती महाराष्ट्रासारख्या राज्याला भूषणावह नसल्याचे सांगत राज्य सरकारच्या हस्तक्षेपाला कंटाळूनच जयस्वाल यांनी प्रतिनियुक्ती स्विकारल्याचे त्यांनी म्हटले.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने जयस्वाल यांची सीआयएसफच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. यामुळे राज्याच्या पोलीस महासंचालक पदासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. केंद्रातून राज्यात परतल्यानंतर युती सरकारच्या काळात जयस्वाल यांची आधी मुंबई पोलीस आयुक्त आणि गेल्यावर्षी पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, राज्यात आघाडीचे सरकार आल्यानंतर गेल्या काही महिन्यात पोलिसांच्या बदल्या आणि राजकीय हस्तक्षेपावरून महासंचालक जयस्वाल आणि राज्य सरकारमध्ये विशेषत: गृह विभागात त्यांच्यात विसंवदा निर्माण झाला. त्यानंतर त्यांनी केंद्रात जाण्याची परवानगी मागितली याला राज्य सरकारने लगेच मान्यता दिली.