मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाल्यानंतर राज्यात भाजपला मोठा धक्का बसला. या पार्श्वभूमीवर आज भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत संवाद साधताना फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटनेचे पूर्ण वेळ काम करण्यासाठी मला सरकारमधील जबाबदारीतून मुक्त करावं, अशी मागणी मी पक्षनेतृत्वाकडे करणार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
https://www.instagram.com/reel/C71F2FLJXnZ/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचं आहे. मला सरकारमधून मोकळं करावं अशी विनंती मी नेतृत्वाकडे करणार आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. मुंबईच्या अध्यक्षांनी स्वत:लक्ष घातलं. जो पराभव झाला त्याची सर्व जबाबदारी माझी आहे. सर्व जबाबदारी देवेंद्र फडणवीस स्वीकारत आहे. आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचं आहे. मला सरकारमधून मोकळं करावं, अशी विनंती मी करणार आहे. बाहेर राहिलो तरी मी काम करीन. पण मला आता पूर्णवेळ विधानसभेकडे लक्ष केंद्रीत करायचं आहे, असं फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस यांनी राज्यात अपेक्षित यश मिळालं नाही याची कबुली दिली.
नरेटिव्ह थांबवता आला नाही
महाराष्ट्रामध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही. किंबहुना आमच्या अपेक्षापेक्षा खूप कमी जागा मिळाल्या. महाराष्ट्रात आमची लढाई महाविकास आघाडीसोबत होतीच, त्याचसोबत नरेटिव्हसोबत करावी लागली. त्यामध्ये संविधान बदलणार असा नरेटिवह तयार करण्यात आला. हा नरेटिव्ह आम्हाला थांबवता आला नाही. त्याला आम्ही उत्तर देऊ शकलो नाही. त्याचा आम्हाला फटका बसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
भाजपला जनतेने नाकारले नाही
जनतेने दिलेला जनादेश माणून आम्ही पुढील तयारी करण्याचा निर्णय घेतला. ज्यांना जास्त जागा मिळाल्या, त्यांचं अभिनंदन करतो. भाजपला राज्यात लोकांनी नाकारले अशी परिस्थिती नाही. सम-समान मते मिळाली आहेत. आज आम्ही बसून निवडणुकीचा आढावा घेतला आहे. कोणते मुद्दे होते याचा आम्ही विचार केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
काही ठिकाणी अँटीइन्कबन्सी दिसली. काही ठिकाणी कांद्याचा प्रश्न होता. सोयाबीन आणि कापूस याचा देखील प्रश्न होता. सरकाने आरक्षण दिल्यानंत एक नरेटिव्ह तयार केला त्याला आम्ही उत्तर देऊ शकलो नाही, असेही फडणवीस म्हणाले.
एनडीएच्या यशावर फडणवीस म्हणाले…
देशभरातील भाजपच्या आणि एनडीएच्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो. पंडित नेहरू यांच्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचा आशिर्वाद जनतेने मोदींना दिला. एनडीएचं सरकार देशात येते. 1962 नंतर पहिल्यांदाच तिसऱ्यांदा सरकार होतेय. ओडिशामध्ये भाजपच प्रथमच सरकार होतेय. आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबूंच्या नेतृत्वात पसंती दिली. अरुणाचल मध्ये पुन्हा भाजपचं सरकार आलं. लोकसभेसोबत एनडीए आणि भाजपला मोठा कौल दिल्याबद्दल जनतेचे आभार.