बहुजननामा ऑनलाईन टीम : सगळ्या उलाढाली नंतरदेखील महाराष्ट्रात सरकार स्थापन झाले नाही. तरी जयपूरच्या ४ गावांची अवस्था मात्र सुधारली आहे. महाराष्ट्रातील ४४ आमदारांना जयपूरपासून २० किमी अंतरावर असलेल्या ग्रामीण भागातील रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते. त्या रिसॉर्टपर्यंत जाण्याच्या जो रास्ता होता, तो जयपूर जिल्ह्याच्या आमेर तहसीलच्या चार गावातून जाणारा हा रस्ता होता.
पण जेव्हा महाराष्ट्रातील आमदार या रिसॉर्टवर आले आणि कॉंग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांनाही त्यांच्या आदरातिथ्यासाठी यावे लागले. त्या ओबडधोबड रस्त्याची दुर्दशा पाहताच, अवघ्या काही दिवसांतच या रस्त्याच्या चेहरामोहराच बदलला. त्यामुळे सरकारने मनावर घेतले तर काय होऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. अवघ्या ५ दिवसात बजेट आले आणि रस्त्याचा कायापालट झाला. रस्तादुरुस्तीबरोबर खांब्यावर एलईडी ट्यूबलाइट देखील लावण्यात आले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी या रस्त्याची अवस्था अत्यंत दुर्दैवी होती, स्त्यात बरेच खड्डे होते, संध्याकाळ झाल्यावर लोकांना गाडी घेऊन जाण्याची देखील भीती वाटत होती. गावकरी या त्रासाला कंटाळून अखेर स्थानिक आमदाराला चपलांचा हार देखील घालणार होते. मात्र या आमदारांच्या येण्याने गावकऱ्यांना चांगला रस्ता पाहायला मिळाला आहे. जयपूरपासून २० कि.मी. अंतरावर असलेला रिसॉर्ट ब्युना व्हिस्टा या दिवसांमध्ये चर्चेत आहे. ५ दिवसाच्या व्हीआयपी चळवळीमुळे परिसरातील कच्चा रस्ता आता पक्का बनला आहे.
Visit : bahujannama.com