नवी दिल्ली ( बहुजननामा ऑनलाइन )- कर्नाटकामधील 14 महिन्यापुर्वी सत्तेत आलेले काँग्रेस –जेडीएस सरकार अखेर पडले. कुमारस्वामींना विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकता आला नाही. कर्नाटकात विश्वासर्धक ठराव जिंकता न आल्याने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकात लालसा विजयी झाली असून, लोकशाही अन् प्रामाणिकपणा पराभूत झाल्याचे म्हटले आहे. तर प्रियांका गांधी यांनी देखील भाजपवर टिका केली आहे. सगळंच खरेदी करता येत नाही. प्रत्येकाची बोली लावली जात नाही. खोट्या गोष्टी एक ना एक दिवस उघड्या पडतात हे भाजपाच्या लवकरच लक्षात येईल, असं प्रियंका गांधी म्हणाल्या आहेत.
गेले महिनाभर सुरु असलेल्या कर्नाटकच्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला. मुख्यमंत्री कुमार स्वामी यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करता आले नाही. महिनाभरापुर्वी काँग्रेस, जेडीएसच्या 15 आमदारांनी राजीनामे दिल्याने कर्नाटक सरकार अडचणीत आले होते. त्यानंतर कुमारस्वामी सरकारनं विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला, त्यात 99 आमदारांनी सरकारच्या बाजूने, तर 105 आमदारांनी सरकारच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे कुमारस्वामी सरकार कोसळले.
बंडखोर आमदारांचे मन वळविण्याचे काँग्रेसने अखेर पर्यंत प्रयत्न केले. मतदानाला उपस्थित न राहण्याऱ्या आमदारांची आमदरकी रद्द करण्याची शिफारस देखील त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली होती. त्यामुळे आमदारकी वाचविण्यासाठी बंडखोर आमदार विधानसभेत मतदानाला नक्की येतील,असा काँग्रेस नेत्यांना विश्वास होता. मात्र तो फोल ठरवत बंडखोर मतदानासाठी आले नाहीत.