नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आम्ही 162 आमदारांच्या सह्याचं पत्र राज्यपालांना दिले असून सत्तास्थापनेसाठी दावा केला आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. महाविकासआघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाविकासआघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन आपल्याला सरकार स्थापन करण्यास निमंत्रित करावे अशी विनंती केली आहे. तिन्ही पक्षांनी मिळून हे पत्र राजभवनमध्ये दिले आहे. या पत्राबरोबर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या 162 आमदारांच्या सह्यांची यादी जोडलेली आहे. याविषयी बोलताना जयंत पाटील म्हणाले की , ‘ फडणवीस बहुमत सिद्ध करू शकत नाहीत. त्यांच्याकडे बहुमत नसताना देखील त्यांनी चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे शपथविधी केला.
आम्ही 162 आमदारांच्या सह्याचं पत्र राज्यपालांना दिले असून सत्तास्थापनेसाठी दावा केला आहे. आमच्या दाव्याचा राज्यपाल महोदय सन्मान करतील व आम्हाला बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलावतील. ‘आवश्यक बहुमत नसताना देखील सत्तास्थापन करण्यात आले असून हा लोकशाही प्रक्रियेचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. आम्ही बहुमत सिद्ध करू शकतो. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. अल्पमतात असणारे हे सरकार लवकर बरखास्त करावे अशी मागणी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
सर्वोच्च न्यायालय उद्या निकाल देणार –
राज्यातील सत्तेचा पेच सुटण्याऐवजी आणखी वाढला आहे. भाजपानं सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं या शपथविधीला सर्वोच्च न्यायालयात आव्हानं दिलं होतं. या याचिकेवर दोन दिवस सुनावणी झाली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं निर्णय राखून ठेवला असून, यावर उद्या (26 नोव्हेंबर) निर्णय येण्याची शक्यता आहे.
Visit : bahujannama.com