बहुजननामा ऑनलाइन – इयत्ता पाचवीचे वर्ग प्राथमिक शाळेला जोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाला काही शिक्षक संघटनांनी विरोध दर्शविला आहे. मात्र, या निर्णयाचे खासगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते पाचवी प्राथमिक स्तर आणि सहावी ते आठवी उच्च प्राथमिक स्तर याप्रमाणे देशातील अनेक राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशांमध्ये अंमलबजावणी सुरु आहे. पण पुढारलेल्या महाराष्ट्रात आतापर्यंत यानुसार अंमलबजावणी होत नव्हती.
पाचवी माध्यमिकला असल्यामुळे प्राथमिक शाळांचा पट कमी दिसत होता. हा प्राथमिक शाळांवर अन्याय होत होता. याबाबत खासगी प्राथमिक शिक्षक महासंघाच्या वतीने राज्यस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. या निर्णयामुळे प्राथमिक शाळांचा पटही वाढणार आहे. तसेच शालेय पोषण आहारात पहिली ते पाचवीसाठी वेगळे आणि सहावी ते आठवी अनुदान वेगळे येते. आतापर्यंत पचवीचा वर्ग माध्यमिकामध्ये असल्यामुळे त्याची नोंद वेगळी ठेवावी लागत होती. परिणामी गोंधळ उडत होता, असे महासंघाच राज्य सहसचिव थिटे यांनी म्हटले आहे.
केंद्रीय नवोदय विद्यालय, केंद्रीय शाळा यामध्ये माध्यमिक स्तर हा सहावी ते बारावी असाच आहे. त्याच प्रमाणे शासनाची शिष्यवृत्ती परीक्षा सुद्धा प्राथमिकचा शेवटचा वर्ग म्हणजे पाचवी आणि उच्च प्राथमिकचा शेवटचा वर्ग आठवी या वर्गांना आहे. सध्या प्राथमिक शाळा पहिली ते चौथी असल्याने शिष्यवृत्ती परीक्षा नाही. त्यामुळे शाळांची गुणवत्ता दाखविणे शिक्षकांना कठिण जात आहे. त्यामुळे अशा सर्व बाबींचा विचार करता शासनाचा हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे थिटे सांनी सांगितले.