पुणे : कोरोना प्रतिबंधक लसीची चाचणी आली आहे. मात्र दिवाळीनंतर बाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने कोरोनाची हि दुसरी लाट आहे अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण हि पहिलीच लाट असल्याचा खुलासा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या साथरोग व संसर्गजन्य आजार विभागाचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी केला असून दुसरी लाट रोखायची असेल, तर नागरिकांनी सुरक्षेचे नियम पाळणे आवश्यक आहे. आपल्याकडे सामूहिक प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) निर्माण झालेली नसल्याने लसीकरणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे लसीकरण होईपर्यंत आपण ‘न्यू नॉर्मल’ आयुष्य जगू शकणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. रमण गंगाखेडकर म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर लॉकडाऊन पुकारण्यात आला त्यामध्ये लोकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे तब्ब्ल चर ते पाच महिन्यांनंतर कोरोनाची पहिली लाट आली. ती अजूनही ओसरली नाही. ती जो पर्यंत ओसरत नाही तो पर्यंत दुसऱ्या लाटेचा अंदाज बांधता येणे शक्य नाही. दुसरी लाट दिसत नसली तरी वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळ्या वेळेत ही लाट येऊ शकते. दक्षता घेतली, तर कदाचित आपण दुसऱ्या लाटेला रोखू शकू.
जगात कधीही १० ते ११ महिन्यात लस विकसित झाली नव्हती. सध्या भारतात आठ लशी चाचणीच्या विविध टप्प्यांवर आहेत. फायझर, मॉडर्ना, स्पुटनिक या लशींची परिणामकारकता ९० टक्क्यांहून जास्त असल्याचे दिसून आले. जागतिक आरोग्य संघटनेने लसीची परिणामकारकता ५० टक्क्यांहून अधिक असली तरी चालेल, असे म्हटले होते. लस विकसित करताना प्रतिकारशक्ती जागृत करणाऱ्या स्पाइक प्रोटीनचा वापर केल्याने परिणामकारक निकाल हाती येतील.
लसीचा एक डोस घेतल्यानंतर हरयाणाचे मंत्री कोरोनाबाधित झाले यासंदर्भात बोलताना ते म्हणाले चाचणीमध्ये ५० टक्के लोकांना प्रत्यक्ष लस आणि ५० टक्के लोकांना प्लासबो दिला जातो. या मंत्र्यांना प्रत्यक्ष लस मिळाली की प्लासबो दिला, ते पाहावे लागेल, तसेच त्यांना दुसरा डोस दिला नव्हता. लस मिळाली असली, तरी पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जातो. त्यानंतरच प्रतिकारशक्ती निर्माण होते. मंत्र्यांना अर्धवट डोस झाल्याने लागण झाली. प्रत्येक व्यक्तीने दोन डोस घेणे जरूरीचे असते.
२५ कोटी लोकांना लस देण्याची आवश्यकता
कोरोनाची लागण सुमारे ८ कोटी लोकांना झाली असण्याची शक्यता सप्टेंबरमधील सिरो सर्व्हेमध्ये म्हंटले आहे. डिसेंबरमध्ये हि संख्या तिप्पट झाली तरी, सुमारे २४ ते २५ कोटी लोकांना लागण झाली असे म्हणता येईल आता हे प्रमाण किती असेल, हे सांगता येणार नाही, पण लसीकरण जून-जुलैपर्यंत होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत २५ कोटींचा आकडा काही प्रमाणात वाढलेला असेल.
जोखीम घ्यायला हवी
मानवी चाचण्यांदरम्यान देण्यात आलेल्या लसींचा दुष्परिणाम जास्त असता, तर तो पहिल्या दोन महिन्यांमध्ये दिसला असता. त्यामुळे याचा फार मोठा दुष्परिणाम होईल, अशी भीती मनात ठेऊ नये. काही दुष्परिणाम लसीकरणानंतर दीड वर्षांनंतरही दिसू शकतात, पण याकडे आपण फायद्याच्या दृष्टीने पाहायला हवे. कारण ९५ टक्के लोकांमध्ये आता दुष्परिणाम दिसलेले नाहीत, त्यामुळे थोडी जोखीम उचलायला हरकत नाही.