नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसचा उद्रेक कायम आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या 24 तासांत 81 हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर यामध्ये 469 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 2021 मधील ही सर्वात मोठी आकडेवारी आहे. त्यानुसार, आता देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सहा लाख पार झाली आहे.
देशात आत्तापर्यंत 1,23,03,131 जणांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला होता. त्यापैकी 1,15,25,039 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर सध्या देशात कोरोनाचे 6,14,696 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मात्र, आत्तापर्यंत 1,63,396 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात गेल्या 24 तासांत 81,466 नवे रुग्ण आढळले आहेत. तर यामध्ये 469 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 50,356 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत.
महाराष्ट्र आणि दिल्लीत सर्वाधिक रुग्ण
देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या ही एकट्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात 43 हजारापेक्षा जास्त रुग्ण एका दिवसात आढळून आले आहेत. आत्तापर्यंत इतकी रुग्णसंख्या कधीही नोंदवली गेली नाही. यातील सर्वाधिक रुग्ण पुणे आणि मुंबईत आहेत. तसेच राजधानी दिल्लीतही कोरोनाचा उद्रेक कायम आहे. दिल्लीत 2790 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. हा आकडा मोठा आहे.