नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही कोरोनाचा कहर वाढला असून, सातत्याने कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. या परिस्थीवरून केंद्र शासन आणि राज्य शासन कोरोनाला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. तर भारतातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्याची मागणी केली जात असताना केंद्र सरकारने यासंदर्भातील एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही लस दिली जाणार असल्याचे केंद्राने म्हटले आहे.
भारतात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला असून, ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातला वेग वाढावा, लसीकरणाची गती वाढावी यासाठी एप्रिल महिन्याच्या कालावधीत कोरोना लसीकरण केंद्र शासकीय आणि इतर सुटीच्या दिवशीही सुरूच राहणार आहेत. सुट्टींच्या दिवशीही कोरोना लसीकरण केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने महाराष्ट्रासह काही राज्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने काही निर्णय घेण्यात आले आहे. त्यात कोरोना लसीकरणाला वेग मिळावा यावर जोर देण्यात आला आहे. ज्या जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अधिक वाढत आहे. त्या जिल्ह्यांत २ आठवड्यात कोरोना लसीकरण करण्याच्या सूचनाही केंद्राकडून देण्यात आल्या आहेत. तसेच, भारतात मागील २४ तासांत कोरोनाचे ७२,३३० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ४५९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १,२२,२१,६६५ वर पोहोचली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १,६२,९२७ पोहोचला आहे.