बहुजननामा ऑनलाइन टीम – आता न्यायालयाने दीड वर्षांसाठी नव्या कृषी कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच शेतकर्यांना आपापल्या घरी जाण्याचा सल्ला द्यायला हवा कारण आता शेतकऱ्यांचे बर्यापैकी समाधान झाले आहे, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. पवार यांनी शेतकरी कायद्याबाबत रविवारी रात्री एक ट्विट केले. त्या ट्विटबाबत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचे प्रयत्न केंद्र सरकारने केले आहेत. याच्यापेक्षा केंद्र सरकारने आणखी काय करायला पाहिजे हे मलाही समजत नाही. महत्त्वाची बाब म्हणजे ज्या दिवशी लोकसभा आणि राज्यसभेत हे कायदे पास झाले, त्यावेळी या कायद्याबाबत चर्चा झाली पाहिजे असे जर शरद पवार यांना वाटत होत, तर त्या दिवशी त्यांनी राज्यसभेत हजर राहणे आवश्यक होते. कृषी सुधारणा कायद्याची अंमलबजावणी आता दीड वर्ष थांबणार आहे, दरम्यानच्या काळात यावर चर्चा होणार आहे आणि विश्वासात घेतले जाणार आहे. त्यामुळे हा आडमुठेपणा चालला आहे. शिवसेनेने तर लोकसभेत पाठिंबा दिला आणि राज्यसभेत बहिष्कार टाकला. बहिष्कार टाकताना मतदान का केले नाही? त्यामुळे हे सगळ निवडणुकीत विजयी न झाल्यामुळे पंतप्रधान मोदी आणि भाजपला त्रास देण्यासाठी सुरू असल्याचे ते म्हणाले.
आज सादर होणारा अर्थसंकल्प हा देशातील शेतकऱ्यांना सुखी आणि सुरक्षित करणारा असेल. शेतकऱ्यांचे जे आंदोलन सुरू आहे, ते गैरसमजुतीतून सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकर्यांना सुखी आणि सुरक्षित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यातूनच शेतकर्यांना भरीव तरतूद मिळेल अशी अपेक्षा आहे. तसेच मध्यम वर्गाची अपेक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असेल असे पाटील म्हणाले.