नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यासह देशात मागील काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीची लाट आली आहे. त्यातच आता या वातावरणात बदल होण्याची शक्यता असून, येणाऱ्या काही दिवसांत महाराष्ट्रासोबत देशातील काही राज्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
“१६ ते २० फेब्रुवारी या कालखंडात देशातील काही राज्यांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसाला आम्ही अवकाळी पाऊस, असेच संबोधणार असून, त्याचा फटका महाराष्ट्र, मध्यप्रदेश, ओदिशा, झारखंड, छत्तीसगड, कर्नाटकचा अंतर्गत भाग, तेलंगणा आणि तामिळनाडूला बसणार आहे,” अशी माहिती स्कायमेट वेदरचे प्रमुख शास्त्रज्ञ महेश पालावल यांनी दिली.
हा अवकाळी पाऊस मान्सूनपूर्व पर्जन्याची चाहूल नसून, मान्सूनपूर्व पावसाची सुरुवात तापमान एका निश्चित स्तरावर गेल्यावर होते. पण, सध्यातरी अनेक राज्यांत पारा हा सामान्य तापमानापेक्षा खाली आहे. पूर्व मध्य प्रदेश आणि त्यांच्या जवळच्या छत्तीसगड तसेच विदर्भाच्या वर एक चक्रीवादळी हवांचे क्षेत्र विकसित होऊ शकते.
त्याद्वारे तेलंगातून दक्षिण तामिळनाडूपर्यंत एक ट्रफ विकसित होऊ शकतो. या दोन्ही हवामानाच्या परिस्थितीमुळे देशातील अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून बाष्प देशातील भूभागावर येईल. त्याने हवामान बिघडून पाऊस पडू शकतो, असे स्कायमेटच्या हवामान तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.