नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात मोठ्या लॉकडाऊननंतर अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात कोरोना संक्रमणाच्या वाढत्या प्रकरणांनी केंद्र सरकार चिंतेत आहे. गेल्या दहा दिवसांत दररोज दहा हजार नवीन रुग्ण आढळल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा मार्गावर आणण्याच्या केंद्राच्या रणनीतीला मोठा धक्का बसला आहे. कोरोनामुळे बिघडणाऱ्या परिस्थितीला हाताळण्याचा सराव वाढवला आहे आणि अनलॉकच्या पहिल्या टप्प्यातील परिस्थितीबद्दल उच्च अधिकार गटांकडून अहवाल मागवण्यात आला आहे. या अहवालाच्या आधारे केंद्र सरकारकडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
केंद्राच्या रणनीतीला धक्का
सूत्रांच्या माहितीनुसार, अनलॉक वन दरम्यान रुग्णांची संख्या इतक्या वेगाने वाढली की १० दिवसांत रुग्णांची संख्या दोन लाखांवरून तीन लाखांवर पोचली आहे. अर्थव्यवस्था पुन्हा मार्गावर आणण्यासाठी सरकार हळू हळू विविध क्षेत्रे उघडण्याच्या योजनेवर काम करत आहे. पण रुग्णांच्या वाढत्या संख्येने सरकारच्या योजनांवर पाणी फेरले आहे.
महाराष्ट्रात संक्रमितांची संख्या वाढली
एकट्या महाराष्ट्रात संक्रमितांची संख्या एक लाखांच्या वर गेली आहे आणि संसर्गाच्या बाबतीत महाराष्ट्राने चीन आणि कॅनडाला मागे टाकले आहे. दिल्ली आणि मुंबईत केवळ संक्रमितांची संख्या झपाट्याने वाढली नाही, तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही वाढली आहे. यामुळे अनलॉक वनबाबत केंद्राच्या रणनीतीला फटका बसला आहे.
नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या जाऊ शकतात
अनलॉक वन दरम्यान उद्भवणार्या परिस्थितीचा गंभीरपणे अभ्यास केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्र सरकारमधील उच्च अधिकार असणारे समूह कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांवर लक्ष ठेवून आहेत. विविध राज्यांच्या आकडेवारीचादेखील गांभीर्याने अभ्यास केला जात आहे. दिल्ली आणि मुंबईसह अन्य महानगरांच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. यासंदर्भात एक अहवाल तयार केला जात असून, त्यानंतर सरकारकडून नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली जाऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
केंद्र सरकारसमोर हे संकट
रूग्णांची संख्या इतक्या वेगाने वाढत आहे की, अनेक राज्यांकडून लॉकडाऊन वाढवण्याची मागणी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा १६ आणि १७ जून रोजी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्स करणार आहेत. या व्हिडिओ कॉन्फरन्स दरम्यान वेगवेगळ्या राज्यांमधील परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन करावे किंवा नवीन मार्गांनी सध्याच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करावा, असे संकट केंद्रासमोर निर्माण झाले आहे. यासंदर्भात राज्येही केंद्राच्या सूचनांची वाट पाहत आहेत. आता सर्वांचे लक्ष केंद्र सरकारच्या पुढच्या पावलावर आहे.
केंद्र आणि राज्ये यांच्यात चर्चा होईल
पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगशिवाय केंद्र सरकार आणि राज्ये यांच्यातही उच्चस्तरीय सल्लामसलत होण्याची शक्यता आहे. या चर्चेत अनलॉक वन दरम्यान बिघडलेल्या परिस्थितीवर नियंत्रण करण्याबाबत चर्चा केली जाईल. या चर्चेदरम्यान नवीन मार्गदर्शक सूचनांच्या तयारीबाबतही विचार केला जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. आरोग्य मंत्रालयही या संदर्भात विविध राज्यांशी संपर्क साधत आहे.
केंद्राने या कारणामुळे सुरु केला सराव
केंद्र सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचेही म्हणणे आहे की, आता कठोर पावले उचलण्याची गरज आहे अन्यथा जुलैमध्ये ही परिस्थिती बिकट होऊ शकते. आरोग्य तज्ञांनी देखील इशारा दिला आहे की, जुलैमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत अनपेक्षित वाढ नोंदवली जाऊ शकते. अशी संकटाची परिस्थिती टाळण्यासाठी केंद्र सरकारने एक सराव सुरू केला आहे.