मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कोकण दौरा केला. मात्र भाजपाचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्याच्या कोकण दौ-यावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्याचा कोकण दौरा म्हणजे नुसता फेरफटका आणि नौटंकी दौरा असल्याचे राणे यांनी म्हटले. तसेच पत्रकारांच्या एका प्रश्नावर मुख्यमंत्री कोकणातील चिवला या ठिकाणी येऊन गेले, असे म्हटले. यावर हो, ते चिवला येऊन गेले. माझ तिकडे घर आहे. नारायण राणेंनी घर कस बांधल. ते बघायला आले असतील. मला याबाबत माहिती असते, तर मी घरी थांबलो असतो आणि त्यांना नारळाचं पाणी दिले असतो, असा मिश्किल टोला राणेंनी लगावला आहे.
नारायण राणे यांनी बुधवारी (दि. 26) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीवर टीका केली. राणे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी कोकणचा दौरा केला, पण त्यासाठी किती वेळ दिला. लगेच दोन दिवसांत तुम्ही पॅकेज जाहीर का केले नाही. तसेच देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या तिजोरीत काहीच नाही. मुख्यमंत्र्यांनी 15 मिनिटांचा दौरा केला. पर्यटकांसराखे फक्त वाळूवर फिरून आले, असा टोला राणे यांनी लगावला आहे. कोरोनाच्या औषधासाठी काढलेल्या टेंडरमध्येही महाविकास आघाडी सरकारचा भ्रष्टाचार असल्याचा आरोप राणे यांनी केला आहे. तसेच पोलीस वसाहतीच्या टेंडरमध्येही भ्रष्टाचार होत असून प्रत्येक खात्यात चाललेला भ्रष्टाचार मी पुराव्यानिशी उघड करणार, असा इशारा राणे यांनी दिला आहे. दरम्यान तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांना निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाणार आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सात जिल्ह्यांव्यतिरिक्त तौक्तेचा फटका बसलेल्या इतर जिल्ह्यांनाही ही मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे. मदतीपासून कुणीही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यानी दिली आहे.