नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करत एक पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. तर यावरून लोकसभेतही गोंधळ उडाला आहे. तर काही भाजपा खासदारांनी पत्राचा मुद्दा पत्राचा मुद्दा उपस्थित केला आहे. तर त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केल्याने यावरून पंजाबचे काँग्रेस खासदार रवनीत सिंह यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. भाजपाला मध्य प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्र तोडायचा आहे. हे खपवून घेतलं जाणार नाही, असा कडक इशारा सिंह यांनी दिला आहे.
राज्यात चाललेल्या घडामोडीवर पुण्याचे भाजपाचे खासदार गिरीश बापट यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. बापट यांच्याबरोबरच खासदार पुनम महाजन आणि नवनीत राणा यांनीही महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. “महाराष्ट्रात आजपर्यंत गुन्हेगार खंडणी मागत होते. आता सरकार खंडणी मागायला लागलं आहे. गृहमंत्री खंडणी मागायला लागले आहेत. त्या पोलिसांना मुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद आहेत. तर म्हणजे कुंपन शेत खायला लागली आहे आणि पाण्याला तहान लागली आहे. सरकार भ्रष्ट होत चाललं आहे. त्यामुळे ताबडतोब महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा आणि या गुन्हेगारांना तुरुंगात टाका, अशी मागणी गिरीश बापट यांनी केली आहे.
दरम्यान, या भाजपच्या आरोपावरून काँग्रेस खासदार रवनीत सिंह म्हणाले, हा फार गंभीर मुद्दा आहे. ही फक्त महाराष्ट्रापुरती गोष्ट नाही, तर ही संपूर्ण भारतातील गोष्ट असून, चिंतेची बाब आहे. परंतु हे कोठून होतं आहे. ज्या ठिकाणी विरोधी पक्षांची सरकार आहेत, तिथे संघराज्याची चौकट का तोडली जाते. तिथेच केंद्रीय संस्था का हस्तक्षेप करतात. आपण परस्परावर आरोप करून जे मूळ आरोपी असतात, जे गुन्हेगार अधिकारी असतात, ते यात वाचतात. राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप करतात आणि गुन्हे करणारे अधिकारी बाजूला राहतात. आपण बोलत राहू परंतु अधिकारी सुटता कामा नये. हा तोच अधिकारी जो यांना चांगला वाटतो. अधिकारी दोन्ही बाजूने काम करतात. मात्र, महाराष्ट्र राज्यात इथून असे अधिकारी पाठवले जातील, तर सहन केलं जाणार नाही. महाराष्ट्र खूप चांगलं राज्य आहे. पण, तुम्हाला महाराष्ट्रही मध्य प्रदेशसारखा तोडायचा आहे. असं भाजपाला उद्देशून त्यांनी म्हटलं आहे. तिथलं सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जातो आहे. हे खपवून घेतलं जाणार नाही. बाहेरच्या तपास यंत्रणांचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असा सूचक इशारा रवनीत सिंह यांनी दिला आहे.