मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह अनेक पक्षातील कार्यकर्ते भाजपमध्ये गेले. राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर ऑपरेशन लोटस राबवण्याच्या हालचाली सुरु झाल्या पण महाविकास आघाडी भक्कम राहिली. मात्र, त्यानंतर वेळोवेळी विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ऑपरेशन लोटस राबवण्यात येणार असल्याचे संकेत दिले खरे मात्र प्रत्येक वेळी त्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे खोडा बसला. दरम्यान, नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षाचा राजीनामा दिल्याने तिन्ही पक्षात अंतर्गत धुसमुस झाली पण, सरकारकडे भक्कम बहुमत असल्याने नाना पटोले यांच्या जागी नवीन अध्यक्ष निवडताना कुठलीही अडचण येणार नाही असे चित्र आहे, परंतु या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस, नारायण राणे यांनी केलेल्या एका विधानामुळे मात्र या निवडणुकीत काही वेगळे होईल का, याची चर्चा सुरू झाली आहेच पण त्याच बरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असल्याने ऑपरेशन लोटस पुन्हा गती पकडणार का अशीही चर्चा आता रंगू लागली आहे.
राज्यात २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले. त्यावेळी ठरल्याप्रमाणे विधानसभा अध्यक्षपद ५ वर्षासाठी काँग्रेसला देण्यात आले. त्यानुसार सरकारने १६९ मते घेत विधानसभेत बहुमत सिद्ध केले होते. पटोले यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. पटोेले यांच्या जागी आता नवे अध्यक्ष निवडताना हे पद काँग्रेसकडे जाणार हे निश्चित मानले जाते. पटोले यांनी विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन जवळ असताना राजीनामा द्यायला नको होता, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केले होते. तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या राजीनाम्यवरून नाराजी व्यक्त केली होती. यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. या सर्व घडामोडीवर एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही कोणतीही शिडी न वापरता फासे पलटू शकतो’ असे विधान केल्याने विधानसभाध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने ‘ऑपरेशन लोटस’ होणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी रविवारी सिंधुदुर्गात आहेत. शहा यांच्या पायगुणाने महाविकास आघाडी सरकार पडावे, असे विधान राणे यांनी शनिवारी केले. त्यामुळे ‘ऑपरेशन लोटस’ चर्चेने अधिकच गती पकडली आहे. मात्र काँग्रेसच्या एका नेत्याने ही शक्यता फेटाळली असून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष मजबुतीने एकत्र आहेत आणि अध्यक्षपदाची निवडणूक अगदी सोपी असल्याचे त्यांनी सांगितले.
फडणवीसांच्या विधानाचा शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी संचार घेतला. ते म्हणाले की, फासे सगळ्यांनाच टाकता येतात. फडणवीस यांनी वर्षभर बरेच फासे टाकून पाहिले पण सरकार स्थिर आहे. त्यांचे फासे गुळगुळीत झाले आहेत असा टोला त्यांनी लगावला.
विधानसभा अध्यक्ष पदावरून शिवसेनेने मुखपत्र असलेल्या सामनातून काँग्रेसला सुनावले होते. काँग्रेसला पाच वर्षांसाठी अध्यक्षपद दिलेले होते, एक वर्षात राजीनामा देऊन नव्याने निवडणूक घेण्यासाठी नाही. काँग्रेसने त्यांचा पक्षांतर्गत बदल केला हा त्यांचा अधिकार; पण सरकार, विधानसभा, बहुमताचा आकडा यावर त्या निर्णयाचा परिणाम होणार नाही यासाठी सावधान राहावे लागेल, असेही या अग्रलेखात म्हटले आहे. विधानसभा अध्यक्षपदाचे काय करावे यावर तीन पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील, या शरद पवार यांच्या वक्तव्याची आठवणही मुखपत्रात करून देण्यात आली आहे.
विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार
सांगली : महाविकास आघाडीचे सरकार स्थापनवेळी कोणते पद कोणाकडे राहणार, याची सविस्तर चर्चा झाली होती. त्यानुसार हे पद काँग्रेसला मिळाले. त्यामुळे आता यावर पुन्हा चर्चा करण्यात काही अर्थ नाही. हे पद काँग्रेसकडेच राहील. याबाबत आणखी कोणत्या घटक पक्षाचे काही वेगळे मत असेल तर त्यावर पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील, असे मत कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
विश्वजित कदम, पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यानुसार नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आल्याने विधानसभा अध्यक्षपदाबाबत आता पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. भाजपने संपूर्ण देशात हुकूमशाही कारभार सुरू केला आहे. कोणाचेही म्हणणे ऐकून घेण्यास ते तयार नाहीत. त्यांनी गोरगरीब जनता, शेतकरी व अन्य घटकांचा विचार केला नाही तर येणारा काळ त्यांना माफ करणार नाही, असेही ते म्हणाले.