पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना 100 कोटींच्या वसूलीचे टार्गेट दिल्याचा आरोप तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केले होते. त्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला. देशमुख यांच्या घरासह अन्य काही ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने या कारवाईमागे भाजप असल्याचा आरोप केला आहे. त्याला आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे.
चंद्रकांत पाटील हे पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने शेवटी एफआयआर दाखल केलाच. मुंबई, नागपूर घरासह दहा ठिकाणी छापे घालून तपासणी सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सीबीआय कायदेशीर कारवाई करत आहे. यातून जे निष्पन्न होईल. त्यानुसार कारवाई होईल. आज काही सुपात आहेत, काही जात्यात आहेत. परमेश्वर सर्वांचाच हिशेब पूर्ण करतो. या जन्मी केलेले याच जन्मी भोगायचे आहे.’
तसेच एनआयएच्या कोठडीत असलेल्या सचिन वाझे यांनी अनिल परब आणि घोडावत यांच्यावरही आरोप केले आहेत. त्यांचीही सीबीआय चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी केली. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सीबीआय कायदेशीर कारवाई करत आहे. यातून जे निष्पन्न होईल. त्यानुसार कारवाई होईल, असेही पाटील म्हणाले.
काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. देशमुख यांनी काही पोलिस अधिकाऱ्यांना खंडणी वसुलीचे टार्गेट दिले होते, असे सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले होते.