बहुजननामा ऑनलाईन टीम – भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडत ‘छत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ’ ही घोषणा दिली होती. तर आता भाजप या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीसाठी “शिवरायांचा विचार, तोच आमचा आचार” ही घोषणा घेऊन मैदानात उतरणार आहे.
शिवसेना – भाजपची दोन दशकांहून अधिक जुनी युती २०१४ मध्ये तुटली. भाजपने युती तुटल्यानंतरच शिवसेनेला शह देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा देण्यास सुरुवात केली होती. शिवसेनेने सर्वप्रथम शिवाजी महाराजांना महाराष्ट्राच्या राजकरणात आणले होते. शिवसेना – भाजप युतीचे सरकार १९९५ मध्ये आले तेव्हा शिवसेनेकडून ती शिवशाही असल्याचा उल्लेख वारंवार केला जात होता. त्याचबरोबर विधानसभेवर भगवा फडकवण्याचे आवाहनही केले जात होते. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेहमीच शाहू, फुले, आंबेडकर यांचा उल्लेख केला जातो.
नरेंद्र मोदी २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यावर दिल्लीत नरेंद्र, राज्यात देवेंद्र अशी चर्चा सुरु झाली होती. केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट संकेत दिले की, निवडणूक जिंकल्यास देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील. मात्र भाजपच्या घोषणेत त्यांचा नाव राहणार नाही, तर यंदाही भाजप छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन निवडणूक लढवणार आहे. तसेच या घोषणामध्ये भाजपने पंतप्रधान मोदी यांच्याही नावाचा समावेश केलेला नाही.
Visit : bahujannama.com