औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी नेहमीप्रमाणे यावेळीही दांडी मारली आहे. ऐन मुक्तिसंग्राम दिनाच्या दिवशी मुंबईत असणाऱ्या जलील यांच्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमणात टीका होताना दिसत आहे. सलग 4 वर्ष आमदार असताना आणि आता खासदार म्हणून निवडून आल्यानंतर जलील यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं टाळलं आहे.
सोशल मीडियावर जलील यांना मुक्तिसंग्राम दिनी ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित राहणार की, नाही असा प्रश्न सोशल मीडियावर विचारण्यात आला होता. याचं उत्तर न देता त्यांनी तुमच्याकडून देशभक्तीच्या प्रमाणपत्राची गरज नाही अशा शब्दात प्रतिक्रिया देऊन नव्या वादाला तोंड फोडलं आहे. जलील यांनी संतप्त प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, “माझ्या उपस्थिती किंवा अनुपस्थितीवरून कोणी माझ्या देशभक्तीची तुलना करू नये. असे विचार डोक्यात येणे यातून संबंधिताची मानसिकता दिसून येते. देशभक्तीचं प्रमाणपत्र मला अशा मानसिकतेच्या लोकांकडून घेण्याची गरज नाही.”
https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=10218194241940540&id=1024109522
आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आहे. औरंगाबादमधील सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहन आणि हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करण्याचा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्याला खासदार, आमदार उपस्थित असणं अपेक्षित असतं. इम्तियाज जलील आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात कधीच या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही. त्यामुळे त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. एका फेसबुक युजरने त्यांना सोहळ्याला हजर राहून रझाकारांची एमआयएम आणि आताची एमआयमएम वेगळी असल्याचं दाखवून द्यावं असं आवाहन केलं आहे. 17 सप्टेंबर हा दिवस रझाकारापासून मुक्तीचा मानला जातो. इतिहासातील एमआयएम हा पक्ष रझाकरांच्या बाजूचा होता अशी टीका एमआयएमवर होते. त्यातच जलील यांनी कार्यक्रमाला दांडी मारून नव्या वादाला तोंड फोडलं आहे.