बहुजननामा ऑनलाइन टीम – बीड जिल्ह्यातील परळी येथे राहणाऱ्या पूजा चव्हाण नावाच्या तरुणीनं पुण्यात आत्महत्या केल्यानंतर वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेतलं जात आहे. अशात ठाकरे सरकार चिंतीत असतानाच यात आणखी एक भर पडली आहे. काल नाना पटोले यांच्या कार्यक्रमादरम्यान एका खासदरानं भर व्यासपीठावर अपशब्दांचा वापर केला. यानंतर आणखी एका मंत्र्यानं धक्कादायक वक्तव्य केलं.
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. अलीकडे साधू हे मनोरुग्ण आहेत, व साधुंसारखे नालायक लोक जगात भेटणार नाहीत असं धक्कादायक वक्तव्य काँग्रेस मंत्री वडेट्टीवार यांनी केलं आहे. नागपूरमध्ये ते बोलत होते.
पुढं बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभली आहे. संत आणि साधू वेगवेगळे आहेत. संत हे समाजासाठी समर्पित आहेत. संत हा समाजाचा दिशादर्शक आहे. परंतु साधू लुबाडणारे असतात. साधू संपत्ती उभारणारे असतात. त्या माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे. ज्याला जी टीका करायची असेल करा असा थेट इशारा त्यांनी दिला. ओबीसी समाजानं साधूंच्या मागे लागू नये असंही ते म्हणाले आहेत.
तुषार भोसेल कोण आहे ? टिळा लावला आणि अध्यक्ष झाला म्हणजे विद्वान होतं का ? 4 पुस्तकं त्यांनी वाचली, 4 आम्ही. आताचे साधू मनोरुग्ण आहेत जे समाजाला अंधश्रद्धेत व धर्मांधतेत गुंतवून त्यांचं शोषण करतात. त्यामुळं त्या विरोधात आम्ही बोलणारच असं त्यानी ठासून सांगितलं.