मुंबई बहुजननामा ऑनलाईन – ईव्हीएमविरोधात सर्व विरोधी पक्ष एकवटले आहेत. राज्यातील आगामी निवडणूका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात यासाठी विरोधक आक्रमक झाले असून २१ ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.
लोकसभा निवडणूकांनंतर ईव्हीएमविरोधातील वातावरण तापले आहे. सर्व विरोधी पक्षांतील नेते राज ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात,राजू शेट्टी, छगन भुजबळ, आमदार कपिल पाटील, शेकापचे नेते जयंत पाटील, माजी न्यायमुर्ती बी. जी. कोळसे पाटील आदी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत आंदोलनाची घोषणा केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएमविरोधात सोनिया गांधी आणि काल तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. त्यानंतर आता राज्यातील सर्व विरोधकांनी एकत्र येत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
ईव्हीएमविरोधात २१ ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाला कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल. तसेच या आंदोलनादरम्यान जनतेकडून बॅलेटपेपर संदर्भात अर्ज भरून घेतले जाणार आहेत. अमेरिकेत डोनाल्ड ट्रंप यांच्या विजयाने संशय निर्माण झाला आहे. त्यासोबतच ईव्हीएमची चीप अमेरिकेत बनते. तसेच ईव्हीएम मशीन मध्ये काहीही घडू शकते. केंद्रात सत्ता आल्यानंतर आता राज्य गिळंकृत करायची असा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. मी अनेक वेळा निवडणूक आयोगाच्या लोकांना अधिकाऱ्यांना प्रश्न विचारतो तेव्हा त्यांनी उत्तरं दिली नाहीत. या आंदोलनात जनतेने सहभागी व्हावं असं आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. राज्यातील सर्व राजकिय पक्षांच्या प्रमुखांना बैठकीत बोलवण्यात आलं होतं. पारदर्शक निवडणूका घेण्यासाठी एक फ़ॉर्म काढून आम्ही तो लोकांकडून भरून घेणार आहोत. निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात अशा मागण्यांचे फॉर्म सर्वपक्षीय़ कार्यकर्ते जनतेकडून भरून घेणार आहेत.