मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – काही दिवसांपूर्वीच आपल्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याच्या नैराश्यातून तिच्या वडिलांनी लोकल खाली आपला जीव दिल्याची माहिती समोर आली होती. पांचाराम मिठारीया (४८) असे या वडिलांचे नाव असून वडाळा पोलीस स्थानकात यासंबंधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र अद्यापही पोलिसांनी अपहरण केलेल्या मुलीचा शोध घेण्यास सुरुवात न केल्याने स्थनिकांपासून या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला जात असून नागरिकांनी कुर्ला सिग्नल रोखून धरला आहे. तसेच सायन- पनवेल महामार्गावर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. एवढेच नव्हे तर संतप्त जमावाने वाहनांची तोडफोड करत पोलिसांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
दरम्यान पांचाराम मिठारीया हे कुर्ला येथील ठक्कर बापा कॉलनीत दोन मुले , मुलगी आणि पत्नी सोबत राहत होते. एकूलती एक मुलगी असल्याने त्यांच्या मुलीवर जीव होता. परंतु मुलगी कॉलेजला गेल्यापासून तिच्या वागण्यातील विचित्र बदल घरातील सदस्यांना जाणवत होता. तिचे तासनतास मोबाईलवर चोरून बोलणे, कॉलेजमधून उशिरा घरी येणे. हे सर्वानी पहिले होते, परंतु वडिलांच्या आपल्या मुलीवर विश्वास असल्याने त्यांनी याकडे फारसे लक्ष दिले नाही. परंतु त्यांची मुलगी काही महिन्यांपूर्वी अचानक बेपत्ता झाली. खूप शोध घेहूनही तिची काहीच माहिती मिळाली नसल्याने त्यांनी नेहरूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
मात्र , पोलिसांना मुलीची काहीच माहिती न मिळाल्याने पांचाराम यांनी टोकाचे पाऊल उचलत टिळकनगर रेल्वे स्थानकाजवळील धावत्या लोकल खाली आपला जीव दिला. या घटनेचे पडसाद आता सगळीकडे उमटत आहेत. त्यामुळे स्थानिकांनी पोलिसांच्या कारभारावर निराशा व्यक्त करत आंदोलन करण्यास सुरुवात केली. संतप्त जमावाने अनेक गाड्यांचे नुकसान देखील केलं आहे. तसेच सायन- पनवेल महामार्ग रोखून धरल्याने प्रवाशांचे आतोनात हाल झाले.
Visit : bahujannama.com