बहुजननामा ऑनलाईन – राज्यात अनलॉक 5.0 सुरू झालेलं असलं तरी मुंबई लोकल लवकर सुरू होणार नाही, लोकलची संख्या वाढवण्यावर भर देणार असल्याचंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. लोकलची सख्या वाढल्यानंतर त्यात आणखी लोकांना प्रवास करण्याची परवानगी देऊ. मला गर्दी नकोय, मला कोरोनाचा फैलाव नको आहे असंही सीएम ठाकरे म्हणाले आहेत. त्यामुळं राज्य अनलॉक जरी होत असलं तरी काळजी घेत असल्याचं दिसत आहे. राज्य सरकारच्या या संयमी भूमिकेवरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “केंद्रानं परवानगी दिल्यानंतरही राज्य सरकारनं मंदिरं सुरू केली नाहीत. राज्य सरकारची भूमिका केंद्र सरकारविरोधी आहे. डिसेंबरपूर्वीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येईल” असं भाकित त्यांनी केलं.
पुढं बोलताना ते म्हणाले, “सध्या देशात बिहार विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. सर्वांचं लक्ष या निवडणूक प्रक्रियेकडे लागलं आहे. त्यामुळं बिहारमधील निवडणुकांनंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल.”
आंबेडकर म्हणतात, “राज्य सरकारची भूमिका केंद्र सरकार विरोधी आहे. कृषी विधेयक आणि मंदिर उघडण्यासारखे केंद्राचे निर्णय राज्य सरकारनं धुडकावले आहेत. राज्यघटनेनुसार राज्याला केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात जाता येत नाही. परंतु महाविकास आघाडी सरकार केंद्राविरोधी भूमिका घेत आहे” असं म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.