मुंबई बहुजननामा ऑनलाईन – पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेल्यानंतर मंत्री गिरीश महाजन सेल्फी काढण्यात मग्न असल्याचे असंवेदनशील चित्र दिसले. त्यानंतर भाजपवर टीकेची झोड उठली. मात्र आता आणखी एक प्रकार समोर आला आहे. पूरग्रस्तांना मदत म्हणून दिल्या जाणाऱ्या अन्नधान्याच्या पॅकेट्सवर चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांनी आपला फोटो असलेले स्टिकर लावले आहेत. त्यामुळे सोशल मिडीयावर नेटकऱ्यांनी मात्र संताप व्यक्त करत अक्षरश: झोडपून काढले आहे.
कोल्हापूर येथील पूरस्थितीचा आढावा गेल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी सेल्फी काढल्यावरून ते पूरपर्यटनासाठी गेले आहेत का ? असा संतप्त सवाल विचारत विरोधकांसह नेटकऱ्यांनी झोडून काढले होते. त्यानंतर आता आमदार हाळवणकर यांनी अन्नधान्याच्या पॅकेट्सवर फोटोंचे स्टीकर्स लावल्याने संताप व्यक्त केला जात आहे. यावर राजू शेट्टी म्हणाले, हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे. हा प्रकार म्हणजे मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखा आहे. सरकारच्या पैशांवर अशी जाहिरातबाजी करणे चुकीचे आहे. जनता या लोकांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.
तर प्रसिद्धीसाठी सरकार वाटेल ते पाऊल उचलत आहे. हे लोक चमकोगिरी करत आहेत. कार्यकर्त्यांनी छुप्या पद्धतीने स्टिकर लावण्यास सांगितले असतील असा आरोप कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केला आहे. या सर्व प्रकारावर सुरेश हाळवणकर यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे. पूर ओसरल्यानंतर मदतीसाठी शासन निर्णय आला. त्यानंतर तातडीची बैठक घेऊन आम्ही बैठक घेऊन धान्याची मदत देण्यासाठी आम्ही पॅकेटस तयार केले. ही मदत शासनाची आहे. मात्र रेशन दुकानदारांनी हे फोटो लावले आहेत. रेशन दुकानदारांच्या कमीटीला मी बोललो आहे. महाराष्ट्र शासन लिहिणे अपेक्षित असताना रेशन दुकानदारांनी हे स्टिकर लावले आहेत. ते काढण्याबाबत सांगितले जाईल असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.